कोरोनानंतरचे शिक्षणक्षेत्र

0
284
  • हेरंब कुलकर्णी

यंदा शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झालं आणि त्यावर सातत्याने नियंत्रणं लादली जातील, अशी भीती वाटते. त्यामुळे शिक्षणातून आपण घडवू पहात असलेल्या बदलांवर मर्यादा येणार आहे. या निमित्ताने काही नव्या संकल्पना पुढे येतील. काही पालकांनी प्रायोगिक तत्त्वावर होम स्कूलिंग ही कल्पना राबवली होती. आता शाळा दीर्घकाळ बंद राहू शकतात, हे लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीबाहेर शिक्षणाच्या संधी शोधाव्या लागतील.

वेगवेगळ्या क्षेत्रांवर कोरोना संसर्गाचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी कार्यरत असलेल्या शिक्षणक्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना वाटतं की, शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल आणि शाळा हे हजारो विद्यार्थी एकत्र येण्याचं ठिकाण असल्याने त्यावर सातत्याने नियंत्रणं लादली जातील. संसर्गाची थोडीशी चाहूल लागली तरी शाळा बंद केल्या जातील. काश्मीरमधली शांतता जशी तात्कालिक असते, कुठे काही घडलं की लगेच संचारबंदी होते, असंच चित्र दुर्दैवाने किमान पुढील वर्षभर आपल्याकडे पहायला मिळत राहील. त्यामुळे शाळा या अतिशय अस्थिर केंद्र होतील, असं वाटत आहे. त्यात काळजी करणारा पालकवर्ग जास्त चिंता करेल, अनेकजण मुलांना शाळेत पाठवणार नाहीत. त्यामुळे शिक्षणातून आपल्याला जे काही घडवायचं आहे, त्याला खूपच मर्यादा येणार आहेत, असं वाटतं. या निमित्ताने काही नव्या संकल्पना पुढे येतील. काही पालकांनी प्रायोगिक तत्त्वावर होम स्कूलिंग ही कल्पना राबवली होती. पण शाळा अशा दीर्घकाळ बंद राहू शकतात, याची आपल्यापैकी कोणीही कल्पना केली नव्हती. त्यामुळे शाळेच्या इमारतीबाहेर शिक्षणाच्या संधी साधण्याचा विचार आता विकसित करायला हवा. किंबहुना, तो अपरिहार्यतेतून होणारच आहे. होम स्कूलिंगमध्ये विद्यार्थी घरीच शिकतात. हा प्रघात आता नव्याने सिध्द होईल.
अनेक प्रसिद्ध माणसांनी आपल्या मुलांना घरी शिकवलं आहे. होम स्कूलिंग पूर्वी कठीण होतं. परंतु इंटरनेटमुळे आज परदेशातल्या अनेक वेबसाईट्‌स मुलांना रोजच्या रोज गृहपाठ देणं, ऑनलाईन शिकवणं असा वर्षभराचा अभ्यासक्रम तयार करून घेतात. याखेरीज होम स्कूलिंगला शासनाने प्रतिष्ठा द्यायला हवी. त्यातून विद्यार्थी शिकू शकतील. कोरोनाचं संकट दूर झालं तरी विद्यार्थ्यांना वर्षभरात १४५ दिवस सुट्टी असते. या पाच महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना पुस्तकाव्यतिरिक्तचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने कसं देता येईल, विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा विकसित करता येतील, याचा विचार या होम स्कूलिंगच्या निमित्ताने करायला हवा. ही खरं तर कोरोनामुळे घडलेली एक सकारात्मक संधी आहे, असं मला वाटतं. मुक्त विद्यापीठ, मुक्त शाळा हे सारे प्रयोग यानिमित्ताने मुख्य प्रवाहाचा भाग बनण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात शिक्षक आणि विद्यार्थी मिळणारा वेळ स्वतःच्या विकासासाठी वापरत असल्याचं अपवादाने दिसत आहे. याचं कारण असं की एकांताचा वापर कसा करता, यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अवलंबून असते. परंतु या एकांताचा विनियोग करण्याचे छंद किंवा सवय आपल्याकडे ङ्गारशी विकसित झाली नाही. वाचन हा आपल्या समाजमनाचा भाग बनू शकलेला नाही. त्यामुळे शिक्षक समुदायातही खूप वाचन असणारे शिक्षक संख्येने कमी आढळतात. पालकांची अवस्था तशीच आहे.

अनेक घरांमध्ये लाखो रुपयाचे ङ्गर्निचर आहे. परंतु पुस्तकं नाहीत. दीर्घ सुट्टीच्या काळात हे लक्षात येतं की, घरातच पुस्तकं नाहीत. त्यामुळे उपलब्ध असणार्‍या कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्हीकडे मुलं आकर्षित झाली आहेत. यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. याचं कारण घरात पालकांमध्ये ती वाचन संस्कृती नाही. पूर्वीचे पारंपरिक घरगुती खेळही नव्या पिढीच्या मुलांना माहीत नाहीत. त्यामुळे इतकी मोठी व्यक्तिमत्त्व घडवणारी संधी देणारी सुट्टी असूनही शिक्षक आणि विद्यार्थी-विकासासाठी ङ्गार वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांना आता ऑनलाईन छंदवर्ग घ्यावे लागतील, असं दिसत आहे. कोरोनाचा आणखी मोठा ङ्गटका हा वंचितांच्या शिक्षणाला बसणार आहे. याचं कारण कोरोना संकट टळल्यानंतर समाजजीवन पूर्ववत होईल, तेव्हा अनेकांच्या नोकर्‍या गेलेल्या असतील. स्थलांतरित मजूर हे पुन्हा आपल्या राज्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होईल. पुढील काळात गरीब कुटुंबांचा जीवनसंघर्ष अतिशय तीव्र होणार आहे, महागाई वाढणार आहे. अशा काळात मुलांना शिकवण्यापेक्षा कामाला लावण्याकडे काही पालकांचा कल होऊन समाजात बालमजुरी वाढेल, मुलींची जबाबदारी नको म्हणून बालविवाह वाढतील आणि शाळांमधून मुलींची मोठ्या प्रमाणावर गळती होईल.

अगोदरच अनेकांना महाग असलेलं उच्च शिक्षण परवडत नव्हतं. आता तर गरीब कुटुंबातली मुलं उच्च शिक्षणाकडे न वळण्याचा कल असेल. परिणामी, दारिद्य्रामुळे शिक्षणाची गती मंदावेल, अशी साधार भीती यानंतरच्या काळात वाटते. त्यातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढेल. अस्थिर, भेदरलेला समाज हा भीतीपोटी धार्मिकतेकडे ओढला जातो. कोरोनाने घडवलेले अनेक मृत्यू आणि अनेक आजार यातून शहरी आणि ग्रामीण समाज पुन्हा कर्मकांडांकडे वळण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी शिक्षकांना जास्त दक्ष रहावं लागेल. आपण शिक्षणात या दृष्टिकोनाचा सातत्याने आग्रह धरतो. केवळ जगण्यास महत्त्व आल्याने हे सगळेच मुद्दे गेल्या काही काळात पाठीमागे ढकलले जातील, अशी भीती वाटते.

मी असंघटित वर्गासाठी काम करतो. कोरोनानंतरच्या काळात त्यांचीही परवड तीव्र होणार आहे. आजच छोटी दुकानं, हॉटेल या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना सुट्टीत वेतन मिळत नाही. ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी मजूर आणि इतर अनेक असंघटित समाजघटक आज आपल्या घरी गेले असले, तरी घेतलेल्या क्रूर सामाजिक अनुभवांमुळे पुन्हा कामाकडे जाण्याची त्यांची मानसिकता उरलेली नाही. त्यामुळे दिवाळीनंतर कदाचित पुढच्या वर्षीच कामाला जाऊ, अशी या मजुरांची मानसिकता झाली आहे. त्यामुळे ते कामगार कामालाच जाणार नाहीत. यामुळे अर्थव्यवस्था मागे पडेल. पण त्याहीपेक्षा या वर्गाच्या कौटुंबिक अडचणी अधिक वाढतील, अशी स्थिती आहे. स्थलांतरित मजूर हे पुन्हा गाव सोडून दुसरीकडे कामाला जायच्या मानसिकतेत नाहीत. ते एका शॉकमध्ये आहेत, असं या वर्गाचा विचार करताना जाणवतं. आज कितीही नाही म्हटलं तरी समाजामध्ये उद्योजकता वाढली होती. गरिबीचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की, गरीब माणसं ही सरकारवर अवलंबून न राहता आपापले रस्ते शोधत आहेत. त्यातून स्थलांतर वाढलं. भारतात दर वर्षी सुमारे नऊ कोटी कामगार एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात तर सुमारे पाच कोटी कामगार राज्याअंतर्गत एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जातात. असे १४ कोटी कामगार देशात स्थलांतर करतात. पण हे सर्व कामगार आज निराश झाले आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि त्यांच्या जगण्यावर होणार आहे. कामाला गेले नाहीत तर त्यांच्या घरातल्या महिला आणि मुलांचे अधिक हाल होणार आहेत.

आपल्या समाजातल्या वृद्धांची स्थिती अगोदरच वाईट असताना गरीब कुटुंबातले वृद्ध अधिक दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे. एक कार्यकर्ता म्हणून याचं वाईट वाटतं की आपण गेली ७० वर्षं दारिद्य्र निर्मूलन हा विषय बोलत आहोत. आता कुठे उद्योगांच्या वेगवेगळ्या संधी आणि जागरुकतेमुळे दारिद्य्र निर्मूलनाला गती येण्याची शक्यता निर्माण होत असताना कोरोनाने आपले सारे प्रयत्न किमान वीस वर्षं मागे ढकलले आहेत. एका जागतिक अहवालात भारतात दहा कोटी लोक पुन्हा गरिबीत ढकलले जातील, असं म्हटलं आहे. ही आकडेवारी विषण्ण करणारी आहे. यासाठी रोजगारनिर्मिती हे महत्त्वाचं शस्त्र असतं. पण अनेक देशांचं अर्थकारण एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे जागतिक स्तरावरच आता रोजगाराच्या संधी कमी होणार आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढेल आणि गरिबांच्या जगण्याची परवड अधिक तीव्र होईल, हे लिहिण्यापलिकडे आपण या गरिबांसाठी ङ्गार काही करू शकत नाही, ही वेदना, शल्य अधिक सलत राहते.

(कोरोनानंतर पुढे काय?… जनमानसावर झालेला कोरोनाचा परिणाम आणि कोरोनोत्तर काळात अंगिकारायचे बदल, सरकारी-सामाजिक पातळीवर आवश्यक असलेले उपाय यांचा तज्ज्ञांच्या लेखणीतून घेतलेला हा खास वेध.)