होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे स्वीकारार्ह नाही, अशा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत आपली भूमिका स्पष्ट केली. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असून, सामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत याची झळ पोहोचू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आधीच भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील सर्व देशातील संबंधित नेत्यांशी मी चर्चा केली आहे. मी स्वतः हा तणाव कमी करून थांबवण्याचा आग्रह केला आहे. भारताने भारतीय नागरीक, ऊर्जा आणि वाहतुकीशी संबंधित हल्ल्यांचा विरोध केला आहे. व्यावसायिक जहाजांवरील हल्ला आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील बंदी अस्वीकार्य आहे. भारत डिप्लोमसीप्रमाणे युद्धाच्या परिस्थितीतही जहाजांच्या हालचालींकरता निरंतर प्रयत्न करत आहे. भारत प्रत्येकवेळी मानवतेच्या हिताकरता आणि शांतीच्या बाजूने आवाज उठवत राहिला आहे. संवाद आणि कुटनीतीतच या समस्येचं समाधान आहे. आमचा प्रत्येक प्रयत्न तणाव कमी करून संघर्ष संपवण्यासाठी आहे, असे मोदी म्हणाले.
या युद्धात कोणत्याही जीवनावरील संकट मानवतेच्या हिताचे नाही. त्यामुळे भारताचा प्रयत्न सर्व पक्षांना लवकरात लवकर शांतीपूर्व समाधानाकरता प्रोत्साहित करत आहे. असे संकट येतात तेव्हा काही तत्त्वे याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. सागरी सुरक्षा, सीमा सुरक्षा, सायबर सुरक्षा मजबूत केल्या जात आहेत. या युद्धामुळे जगातील कठीण परिस्थिती दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयार राहावे लागेल आणि एकजूट राहावे लागेल. आपण कोरोनाच्या वेळीही एकजुट राहून काम केले. आताही त्याचप्रमाणे तयार राहण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.