हवेत कुशल हात आणि हृदयही!

0
7
  • दिलीप वसंत बेतकेकर

उद्योगजगताला जे हवंय ते शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना मिळत नाही अशी अनेकांची खंत आणि तक्रार आहे. अनेक विद्यापीठांचा अभ्यासक्रम आज कालबाह्य झाला आहे अशी उद्योगसमूहाची धारणा आहे. शाळा-महाविद्यालयांत केवळ माहिती दिली जाते. फार तर ज्ञानवर्धनावर भर दिला जातो. कौशल्य विकास आणि मनोवृत्तीकडे प्रकर्षाने लक्ष दिले जात नाही. पाचपन्नास वर्षांपूर्वी माहीतच नसलेली अनेक नवीन क्षेत्रे, नवी दालने आज खुली होत आहेत. संधी चहुबाजूंनी आहेत. प्रश्न आहे- आपले युवक यासाठी तयार आहेत का?

आपण आपल्या मुलांचं/विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकत नाही. त्यांना भविष्यासाठी तयार करायचं आहे.
आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणायचे, “आपल्याला आपल्या युवकांना अजून ज्या तंत्रज्ञानाचा शोधही लागलेला नाही त्या तंत्रज्ञानाला सामोरं जाण्यासाठी तयार करायचं आहे. ज्या नोकऱ्या/कामं आज मार्केटमध्ये अस्तित्वातच नाहीत त्यांच्यासाठी तयार करायचं आहे. आणि ज्या समस्या, आव्हानं समोर येणार आहेत अशा कल्पनेच्या पलीकडच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार करायचं आहे.”
हे सगळं प्रथमदर्शनी वाचकाला बुचकळ्यात टाकणारं असं वाटू शकेल. पण खोलात जाऊन विचार केला तर डॉ. कलामांनी भविष्याचा अचूक वेध घेतला आहे असे जाणवेल. आज अगदी ‘हॉट जॉब्स’ वाटणारे नजीकच्या काळात लुप्त होतील, आणि नवीन प्रकारच्या आज अनाकलनीय वाटणाऱ्या संधी आपले दरवाजे ठोठावणार आहेत. त्या संधीचे स्वागत करण्याची तयारी आजच्या विद्यार्थ्यांत आहे का, आणि या होऊ घातलेल्या स्थित्यंतराची चाहूल आजच्या शिक्षकाला लागली आहे का, हा खरा प्रश्न आहे.
आपण दरवर्षी हजारो अभियंते, डॉक्टर्स, व्यवस्थापक तयार करत असतो. पण त्यांपैकी किती जणांकडे आवश्यक असणारी योग्यता, पात्रता आहे याचा तपास घेतला तर पदरी निराशाच येते. शैक्षणिक पात्रता असते, पदव्या असतात, उत्तम गुणही मिळवलेले असतात, तरीही रोजगार मिळतोच असे नाही. रोजगार उपलब्धच नाही असे म्हणता येणार नाही. सुमारे 46 टक्के पदवीधरच नोकरीयोग्य असतात. सध्या संगणकाचं युग आहे. पण एमसीए झालेल्यांपैकी फक्त 22.4 टक्के पदवीधर नोकरीयोग्य असतात. पॉलिटेक्निकमधून बाहेर पडलेले केवळ 25 टक्के नोकरीयोग्य आहेत असे एका पाहणीत लक्षात आले आहे.
2015 मध्ये मध्य प्रदेशमधील एक धक्कादायक बातमी वाचली होती. ते कात्रण उपलब्ध आहे. तुरुंगासाठी जेलगार्डच्या जागेसाठी 1,73,216 जणांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला. परीक्षेला इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बसले. बारावी परीक्षा उत्तीर्ण असावेत अशी अपेक्षा होती. यात उच्च माध्यमिक परीक्षा (बारावी) उत्तीर्ण झालेले होते 22 हजार 873, पदवीधरांची संख्या होती 41 हजार 233, डिप्लोमाधारकांची संख्या होती 1 हजार 274, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले 7 हजार 152, तर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेले 3 हजार 968 होते आणि 18 पी.एचडी. झालेले होते.
ही बातमी वाचणाऱ्या कोणाही व्यक्तीला दुःख, वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शिक्षणाची काय ही अवस्था? हे एका राज्यातले उदाहरण. देशभर थोड्याफार फरकाने असेच अस्वस्थ करणारे चित्र दिसते.
एका बाजूला प्रचंड बेकारी आणि दुसऱ्या बाजूला आस्थापनांना कामासाठी माणसेच मिळत नाहीत, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. ‘समुद्र चोहीकडे, पाणी प्यायला थेंबही नाही’ असा विचित्र विरोधाभास बघायला मिळतो. ‘गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी’ ही कवितेची ओळही आठवल्याशिवाय राहत नाही. माणसं खूप दिसतात, पण हवा तसा माणूस काही सापडत नाही. मोठमोठ्या पदव्यांची भेंडोळी काखेला मारून वणवण करत काम शोधणारेही भेटतात. पण माणसांची गरज असूनही त्यांना कामावर ठेवून घ्यायला कोणी तयार नाही असं एक विचित्र चित्र दिसतं.
याचे कारण ‘पदव्या स्वस्त झाल्यात पण शहाणपण महाग!’ माहिती, ज्ञान आहे; पण कौशल्ये नाहीत! अलरवशाळल शुलशश्रश्रशपलश ळी पेीं लशळपस ींहश लशीीं, र्लीीं वेळपस ींहश लशीीं. पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. ‘पोथी पढी-पढी जग मुआ, पंडित भया न कोय।’ अर्थात केवळ पोथ्या वाचून कोणी ज्ञानी होत नाही.
उद्योगजगताला जे हवंय ते शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना मिळत नाही अशी अनेकांची खंत आणि तक्रार आहे. अनेक विद्यापीठांचा अभ्यासक्रम आज कालबाह्य झाला आहे अशी उद्योगसमूहाची धारणा आहे. शाळा-महाविद्यालयांत केवळ माहिती दिली जाते. फार तर ज्ञानवर्धनावर भर दिला जातो. कौशल्य विकास आणि मनोवृत्तीकडे प्रकर्षाने लक्ष दिले जात नाही.
त्यातल्या त्यात काही प्रमाणात तांत्रिक कौशल्ये असतात; पण संभाषण कौशल्य, गटात इतरांबरोबर काम करणं (टीम वर्क) यांसारख्या कौशल्यांचा खूपच अभाव दिसून येतो. विविध सर्वेक्षणे आणि अध्ययनात तांत्रिक कौशल्यांपेक्षा सॉफ्ट स्किल्स अधिक महत्त्वपूर्ण आहेत असे आढळले आहे. दीर्घकालीन नोकरीतील यश हे 75 टक्के सॉफ्ट स्किल्सवर तर फक्त 25 टक्के यश तांत्रिक कौशल्यांवर अवलंबून असल्याचे लक्षात आले आहे.
कारखाने, कंपन्या, उद्योगजगत यांना ज्या प्रकारची माणसे हवीत- ती व तशी- त्यांच्या गरजांपुरता पुरवठा करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट नाही. माणूस घडवणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे; कामगार तयार करणे नाही! पण शाळा-महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभंही राहता आलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाबरोबरच राष्ट्राचा सर्वांगीण उत्कर्षही करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत ‘परा’ आणि ‘अपरा’ अशा दोन प्रकारच्या विद्या सांगितल्या आहेत. दोन्हीही महत्त्वाच्या आहेत हे विसरून चालणार नाही.
आपला युवक नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायला हवा. किमान स्वतःचा चरितार्थ तरी चालवणारा हवा म्हणून व्यावसायिक शिक्षणाची (व्होकेशनल शिक्षण) कल्पना पुढे आली. पण पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण यांच्यात फरकच राहिला नाही. मॅकॅनिक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर इ. छोटे छोटे कोर्सेस सुरू झाले. पण इथेही सर्टिफिकेट घेऊन नोकरीसाठी शोधाशोध सुरूच राहिली. ही योजना फसली. त्याचं एक लक्षात येणारं कारण म्हणजे तांत्रिक कौशल्यांवरच भर दिला गेला. या तांत्रिक कौशल्यांबरोबरच, किंबहुना थोडासा अधिक भर सॉफ्ट स्किल्स आणि मनोवृत्ती (ॲटिट्यूड) यांवर द्यायला पाहिजे, तिकडे दुर्लक्ष झाले.
आज परत एकदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने व्यावसायिक शिक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. शालेय स्तरापासूनच विविध कला आणि कारागिरीचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा अशी रचना होणार आहे. पण यातही परत तोच धोका जाणवतो. तांत्रिक कौशल्यांवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. करिअरमधील यश 80 टक्के सॉफ्ट स्किल्स आणि 20 टक्के यश तांत्रिक कौशल्यांवर अवलंबून आहे असे एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे. पण याचे ‘स्पिरिट’ (भावार्थ) न लक्षात घेता केवळ ‘लेटर’च (शब्दार्थ) लक्षात घेतलं तर परत निराशाच पदरी पडण्याची शक्यता आहे.
स्किल्स कधी आत्मसात केल्या जातील? याचं उत्तर साधं सोपं आहे-
थहशीश ींहशीश ळी ुळश्रश्र, ींहशीश ळी ीज्ञळश्रश्र.
नोकरीच्या जाहिरातीतून जाहीर उल्लेख असतो तांत्रिक ज्ञान, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यांचा. हे बाह्य मापदंड झाले. पण निर्णायक असतात कौशल्ये आणि ॲटिट्यूड. यांचा स्पष्टपणे उल्लेख जरी नसला तरी नोकरी मिळणे न मिळणे यावर अधिक अवलंबून आहे. तांत्रिक कौशल्ये दिली जाऊ शकतात, शिकवली जाऊ शकतात, वाढवली जाऊ शकतात; पण सॉफ्ट स्किल्स शिकवणं, वाढवणं, विकसित करणं कठीण! हे काम ज्याचं त्यालाच करावं लागतं. त्यासाठी सकारात्मक वृत्ती, विजिगीषू वृत्ती आणि कृतज्ञता या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अशी तिपेडी वृत्ती असलेली व्यक्ती तिच्यापाशी नसलेली माहिती, ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करू शकते. ती तिपेडी वृत्ती नसलेली व्यक्ती काहीही प्राप्त करू शकत नाही.
एकविसाव्या शतकात अत्यंत आवश्यक असलेली ही कौशल्ये कोणती? ढोबळमानाने ही सारी कौशल्ये पाच प्रकारांत येतात- करिअर कौशल्य, शिक्षण आणि नवाचार, जीवन कौशल्य, तांत्रिक कौशल्य आणि चारित्र्य.
आज संवाद-कौशल्य हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. व्यक्तीचा अनेकांशी संबंध येतो. विविध प्रकारच्या माणसांशी संबंध येत राहणार. काहीजण आपल्या बरोबरचे (समकक्ष) असतात, काही आपल्या हाताखाली काम करणारे असतात, तर काहीजणांच्या हाताखाली आपण काम करत असतो. आपला संबंध अनेकांशी येत असतो. त्यामुळे संवाद-कौशल्य महत्त्वाचे आहेच; पण त्याचबरोबर लोक-कौशल्य (पीपल स्किल), नेतृत्व क्षमता, मानवी कौशल्यांचीही गरज असते.
तर्कसंगत किंवा तार्किक पद्धतीने विचार करणे, निर्णय क्षमता, समस्या निराकरण क्षमता, सृजनशीलता, वेळ व्यवस्थापन, नियोजन, श्रवण कौशल्य, गटकार्य (टिम वर्क) इ. कौशल्येही महत्त्वाची आहेत.
दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याचा विचार करणे, दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणे, भावनिक आधार देणे हीसुद्धा कौशल्येच आहेत.
पूर्वी बुद्ध्यांकाला महत्त्व दिले जायचे. गोलमनने सामाजिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे हे लक्षात आणून दिले आहे. 2030 मध्ये नोकरीसाठी सामाजिक बुद्धिमत्ता एक महत्त्वाची अट होणार आहे.
पाचपन्नास वर्षांपूर्वी माहीतच नसलेली अनेक नवीन क्षेत्रे, नवी दालने आज खुली होत आहेत. संधी चहुबाजूंनी आहेत. प्रश्न आहे- आपले युवक यासाठी तयार आहेत का?