स्वप्नमेघ

0
115
  • सचिन कांदोळकर

आमचे मयेकरसर म्हणजे ‘समुद्राचा मेघ’च! ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्‍वरीमध्ये ज्ञानस्वरुप सृष्टी निर्माण केली आहे. ‘उघडली कवाडे प्रकाशाची’ अशी त्यांच्या अमृतानुभवात सुंदर ओवी आहे. प्रकाशाची कवाडे उघडून ही ज्ञानदेवसृष्टी आमच्यासाठी खुली करून मयेकरसर गेले आहेत…

कवी अन् साहित्याची व विचारांची मर्मदृष्टी असलेले व्याख्याते प्राचार्य गोपाळराव मयेकरसर गेले… ‘गोमंतशारदे’च्या द्वारी गेली पन्नासेक वर्षे अविरतपणे सळसळणारा ‘सोनेरी पिंपळ’ उन्मळून पडला आहे…
‘असा नक्षत्रगामी रंगलो रंगी फुलांच्या, जोडले नाते युगांचे वेदनेशी या धरेच्या’ असे आयुष्य जगलेला हा कवी म्हणजे नक्षत्रफुलांच्या गोव्यात फुलून गेलेला चाफाच! त्यांची कविता म्हणजे वठलेल्या फांदीवर दरवळणारी आकाशफुलेच! त्यांची कविता म्हणजे फुलून आलेल्या ‘चांदण्यांचा प्राजक्त’! ‘स्वप्नमेघ’च्या रूपानं चांदण्यांची मैफल रंगवून हा कवी आमच्यातून निघून गेलेला आहे…
कविता ही मयेकरसरांच्या मर्मबंधातली ठेव होती. त्यांनी स्वानंदासाठी, स्वतःशीच संवाद साधणारी कविता लिहिली. त्यांची भाषणं मात्र इतरांशी थेट संवाद साधीत होती. पन्नासेक वर्षांपूर्वी त्यांनी म्हणे स्वामी विवेकानंदांवर पणजीत भाषण दिले होते. ते भाषण इतके जबरदस्त झाले की त्यामुळे वक्ता म्हणून त्यांनी गोमंतकीयांच्या हृदयात स्थान मिळवले. गोव्यात ठिकठिकाणी त्यांची भाषणे होऊ लागली. गोव्याबाहेरूनही त्यांना व्याख्यानांसाठी निमंत्रणे येऊ लागली.

मी विद्यार्थिदशेत असताना मयेकरसरांच्या व्याख्यानांचे वर्तमानपत्रांमधील शब्दांकन वाचीत होतो. पुढे मी महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा कळले की शेजारच्या वाणिज्य महाविद्यालयात ते ‘गारंबीचा बापू’, ‘पूर्वरंग’ वगैरे शिकवत होते. मी कला शाखेचा विद्यार्थी. आमच्या कॉलेजात बी.ए.च्या शेवटच्या वर्षात ‘शोकनाट्याचे साहित्यरूप’ हा नवा पेपर समाविष्ट करण्यात आलेला होता. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मयेकरसरांनी ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ व ‘एकच प्याला’ या नाटकांवर व्याख्यानं दिली होती. त्यांची विषय मांडण्याची पद्धत मला आवडली होती. त्यामुळे त्यांची व्याख्यानं ऐकत राहावीशी वाटत होती.

त्यानंतर एम.ए.ला ‘ज्ञानेश्‍वरी’च्या नवव्या अध्यायावर व्याख्यानं देण्यासाठी ते गोवा विद्यापीठात येऊ लागले. तेव्हापासून ते आमचे मयेकरसर झाले. त्यांच्या तोंडून ‘ज्ञानेश्‍वरी’मधल्या ओव्या ऐकताना विलक्षण असं काहीतरी जाणवत होतं. त्यांच्या प्रत्येक व्याख्यानातून त्यांच्यामधील व्यासंगाचे, रसिकतेचे दर्शन घडत होते. ‘ज्ञानेश्‍वरी’मध्ये जो वाङ्‌मयीन गोडवा आहे, त्याचा आस्वाद अतिहळुवारपणे कसा घ्यावा, हे आमच्या पिढीला मयेकरसरांनी शिकवले. आमच्या आधीच्या पिढ्यांमधल्या लोकांना ‘ज्ञानेश्‍वरी’चे कित्येक अध्याय मुखोद्गत होते. मयेकरसरांनी आमच्या पिढीला ‘ज्ञानेश्‍वरी’ची गोडी लावली.
ज्ञानेश्‍वरी म्हणजे मयेकर आणि मयेकर म्हणजे ज्ञानेश्‍वरी असं आज समीकरण झालं असलं तरी फुले-आंबेडकरांसारखे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, तसेच नाटक, संगीत, मराठी भाषा, शिक्षण, धर्म, राजकारण हे विषय त्यांना वर्ज्य नव्हते.

ऐहिक उपयुक्ततेच्या एकाच कसोटीवर शिक्षणव्यवस्था उभारल्याने जीवनात यांत्रिकता आणि स्पर्धेची अवकळा आलेली आहे. ही अवकळा घालवून देण्यासाठी ‘भाषा आणि साहित्य शिकवा आणि समाजात संस्कृती टिकवा’ अशी चळवळ उभारली गेली पाहिजे, असे त्यांचे मत होते. शिक्षणक्षेत्रात मराठी भाषेवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध ते लढले. मराठी भाषेचे ते जाज्ज्वल्य अभिमानी होते. मराठी ही गोमंतकाची भाषा आहे आणि म्हणून ती राजभाषा झाली पाहिजे, या मताचे ते होते. मराठी हाच आपला स्वाभाविक आणि परंपरागत आधार आहे, हे सूत्र ते सतत मांडत होते. गेल्या काही दशकांमध्ये गोमंतकीयांची भाषिक आणि सांस्कृतिक ज्ञानक्षमता घडवण्याचे फार मोठे कार्य मयेकरसरांनी केलेले आहे.

प्राचार्य मयेकरसरांनी आपल्या व्याख्यानांमधून आणि साहित्यामधून आम्हा गोमंतकीयांना उदात्त-मंगल-सर्वांगसुंदर विचार दिला. त्यांची ‘ज्ञानेश्‍वरी’वरील पुस्तके आजही नित्यनूतन, नित्यसुंदर वाटतात. ‘मज दान कसे हे पडले’ हे त्यांचं आत्मकथनात्मक पुस्तक आजच्या साहित्यिक किंवा शिक्षक यांनीच नव्हे, तर राजकारण्यांनीही आवर्जून वाचायला हवे. मयेकरसरांना अजूनही खूप काही लिहायचं होतं. त्यासाठी ते सतत धडपडत होते. आयुष्याच्या सायंकाळी ‘मधुघटचि रिकामे पडती घरी’ असं न म्हणता आयुष्यात जे कमावलं ते समाजाला पुस्तकरूपानं परत करण्याची त्यांची धडपड होती.

गोमंतकातल्या मराठी भाषा व साहित्यचळवळीमधल्या अनेक कार्यकर्त्यांना आम्ही पाहू शकलो नाही. पण केवढं आमचं भाग्य की आम्ही मयेकरांसारख्या मराठीच्या जाज्ज्वल्य अभिमान्याला पाहू शकलो. माझं तर त्याहून मोठं भाग्य की मी मयेकरसरांचा विद्यार्थी होऊ शकलो! मयेकरसरांकडून आम्ही काय शकलो, हे थोडक्यात सांगणे कठीण. अशा अनेक माणसांकडून संस्कार घेत आपण जीवनात मार्गक्रमण करीत असतो. कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या माणसांनी जीवनात विविधांगी अनुभव घेतलेले असतात. जीवन अथांग समुद्रासारखे आहे. त्याचा ठावठिकाणा कसा लागणार? ज्ञानेश्‍वरांनी तर म्हटलं आहे ः
‘समुद्राचा मेघू| उपयोगे तयाहुनि चांगु|’
अवघा समुद्र कोण पाहायला जातो? आपण समुद्राच्या पाण्यातून तयार झालेल्या मेघाकडे पाहूनच समाधान मानतो. आमचे मयेकरसर म्हणजे ‘समुद्राचा मेघ’च! ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्‍वरीमध्ये ज्ञानस्वरुप सृष्टी निर्माण केली आहे. ‘उघडली कवाडे प्रकाशाची’ अशी त्यांच्या अमृतानुभवात सुंदर ओवी आहे. प्रकाशाची कवाडे उघडून ही ज्ञानदेवसृष्टी आमच्यासाठी खुली करून मयेकरसर गेले आहेत…
काळ मोठा कठीण आला आहे. आपल्या भोवतालचे अनेक महावृक्ष कोसळून पडत आहेत. अशाही काळात-
मी एकला किनारी अजुनी बसून आहे|
होडी पल्याड गेली, मी जागतोच आहे॥
असं म्हणणारा एक कवी आमच्यामध्ये अजून ‘जागा’ आहे, ही भावनाच मुळी सुखावणारी होती. पण तो कवीदेखील आमच्यातून निघून गेला आहे.
…म्हापशाच्या टेकडीवरून आता हा ‘स्वप्नमेघ’ दिसणार नाही…