महाराष्ट्रात प्रार्थनास्थळांवरून राज्यपाल-मुख्यमंत्र्यांत पत्रयुद्ध

0
272

महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे खुली करण्याच्या मुद्द्दावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार पत्रयुद्ध सुरू झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकार मंदिरे भाविकांसाठी का खुली करत नाहीत, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाचीही आठवण करून दिली. यावर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना उत्तर दिले आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात १ जून मुख्यमंत्र्यांनी प्रार्थनास्थळे सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र चार महिन्यांनंतरही ती खुली झाली नसल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही हिंदुत्ववादी आहात. तुम्ही सेक्युलर हा शब्द स्वीकारलात का असा सवाल केला आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत सरकार विचार करत आहे. मात्र जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. तसेच ठाकरे यांनी पत्रात पुढे हिंदुत्वाबाबत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे सांगितले आहे.

पवारांनी लिहिले मोदींना पत्र
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राज्यपालांनी एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पत्र लिहिल्यासारखे भासत असून राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीच्या वागण्याचा खेद वाटत असल्याचे पत्रात म्हटले आहे.