महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे

0
12

>> सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाचा निर्णय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा हेच घटनापीठ स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरन्यायाधीश रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावेळी सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या संदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती. मात्र, काल सकाळी कपिल सिब्बल यांनी या संदर्भातील याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानुसार काल दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यावर सुनावणी घेण्यात आली.
या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठासमोर घेतली जाणार आहे. २५ ऑगस्ट रोजी अर्थात ४८ तासांच्या आत ही सुनावणी घेतली जाणार आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर नियोजित असणारी सुनावणी देखील दोन दिवसांनी पुढे ढकलली आहे.