भारतीय महिला

0
134

>> आशियाई चॅम्पियन

महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ असा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. भारतीय महिलांनी तब्बल १३ वर्षानंतर आशिया चषकावर नाव कोरले. या विजेतेपदासह भारताने आगामी हॉकी विश्‍वचषक स्पर्धेसाठी खंडीय विजेता म्हणून थेट प्रवेश मिळविला आहे.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासून दोन्ही संघाने सावध खेळ केला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला नवज्योत कौरने शानदार मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती. मध्यंतरानंतर तिसर्‍या सत्रात चीनने आक्रमणाचा वेग वाढविला. मात्र भारतीय बचावङ्गळीने त्यांचे प्रयत्न यशस्वीरित्या परतवून लावले. त्यानंतर चौथ्या आणि अंतिम सत्रात ४७व्या मिनिटाला चीनच्या टियांजिन लुओने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. शेवटच्या काही मिनिटात दोन्ही संघाने विजयी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण, सामना बरोबरीत सुटला. सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लावावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून राणीने दोनवेळा तर मोनिका, लिलिमा मिन्झ व नवज्योत कौरने गोल केला. नवनीतचा फटका हुकला. चीनतर्फे लियांगने दोन तर वांग व कुईने गोल लगावले. सविताचा भक्कम बचाव चेन यी व झू यांना भेदता आला नाही. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून भारताच्या सविताला पुरस्कार प्राप्त झाला. याआधी भारतीय महिला संघाने २००४मध्ये आशिया चषक जिंकला होता. तर, १९९९ आणि २००९मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २००९मध्ये थायलंडमध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चीनने भारताचा ५-३ असा पराभव केला होता. या पराभवाचे उट्टे भारताने काल काढले.