भाजप जातीपातीच्या राजकारणापासून दूर

0
24

भाजपने कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नसून, भाजप हा सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे, असा दावा भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गिरीश उस्कैकर यांनी काल केला. भाजपने काही महिन्यांपूर्वीच ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षांची निवड केली असून, आता राज्य ओबीसी समिती देखील निवडण्यात आली आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम आदमी पार्टीने गोव्यात त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास भंडारी समाजातील नेत्याची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्याची घोषणा केली आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली भूमिका मांडली. भाजपने कधीही जातीचे व धर्माचे राजकारण केलेले नाही. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर पक्षाचा विश्‍वास आहे. पक्षाने सहा महिन्यांपूर्वीच ओबीसी अध्यक्षांची निवड केली होती. आता ओबीसी समितीचीही स्थापना केली असल्याचे उस्कैकर यांनी सांगितले.