देशात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन शक्य

0
32

>> आरोग्य मंत्रालयाकडून परवानगी; अवयवदान प्रक्रिया सुलभतेसाठी निर्णय लाभदायक

देशात आता सूर्यास्तानंतर शवविच्छेदनास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे देशातील इस्पितळांमध्ये शवविच्छेदन आता सूर्यास्तानंतरही होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काल ट्विट करत ही माहिती दिली.

भारतात सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी नव्हती; पण आता देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे.

नवीन नियमावलीमध्ये आरोग्य मंत्रालयाने असे नमूद केले आहे की, अवयवदानासाठी शवविच्छेदन प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे शवविच्छेदन करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येईल. तसेच कोणत्याही प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळीही शवविच्छेदनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.

या निर्णयामुळे अवयवदानासाठीची प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. रात्री शवविच्छेदन करण्यासाठीचे तंत्रज्ञानही आता उपलब्ध झाल्याने देशभरातल्या रुग्णालयांमध्ये ही प्रक्रिया सूर्यास्तानंतरही पार पाडली जाणार आहे.

कोणत्या मृतदेहांचे शवविच्छेदन रात्री होणार नाही?
रात्री कोणत्या मृतदेहांचे शवविच्छेदन होणार नाही, याची माहिती देखील केंद्र सरकारने दिली आहे. या नियमावलीनुसार, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याशिवाय खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह या श्रेणींमध्ये येणार्‍या मृतदेहांचे रात्रीच्या वेळी शवविच्छेदन केले जाणार नाही. सरकारने या नवीन निर्णयाबाबत सर्व संबंधित मंत्रालये आणि राज्य सरकारांना सूचित केले आहे.