पहिली-आठवीचे वर्ग २२ पासून सुरू करावेत

0
34

>> कोविडवरील कृती दलाची सरकारकडे शिफारस

>> शिक्षण खाते लवकरच परिपत्रक काढणार

इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतचे वर्ग येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू केले जावेत, अशी शिफारस कोविडवरील कृती दलाने सरकारकडे केली आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावून हे वर्ग भरवण्याची शिफारस दलाने केली आहे. तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी काल कृती दलाच्या बैठकीनंतर वरील माहिती दिली.
गेल्या आठवड्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग मुलांना प्रत्यक्ष शाळेत बोलावून भरवले जावेत व हे करताना कोविडसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे अशी शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण खाते आता हे वर्ग सुरू करण्यासाठीचे परिपत्रक लवकरच जारी करणार आहे.

दरम्यान, पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार असले तरी सकाळची प्रार्थना घेण्यास मनाई असेल असे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणात कुठेही गर्दी होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना शाळा व्यवस्थापनांना करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जर भविष्यात राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली तर वर्गांना कात्री लावून वर्गांची संख्या कमी करण्यात येणार असल्याचेही डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले. तीन महिन्यांपूर्वीच सरकारने नववी इयत्तेपासूनचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती.

कोविडवरील तज्ज्ञ समितीने सरकारला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग राज्यात सुरू करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता कृती दलानेही २२ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करण्याची शिफारस केली आहे.

कोविडवरील तज्ज्ञ समितीने वरील इयत्तांचे वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले असले तरी या संदर्भातील पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी ही कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने स्थापन केलेल्या कृती दलावर असेल असे म्हटले होते. कोविडवरील तज्ज्ञ समितीमध्ये डॉक्टरांचा भरणा असून कृती दलात प्रामुख्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा भरणा आहे.
दरम्यान, राज्य सरकार राज्यातील १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्याबाबत विचार करीत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची सध्या वाट पाहत आहे. १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करताना ज्या मुलांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कोविड तज्ज्ञांच्या समितीतील एक सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी म्हटले होते.

दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग तसेच महाविद्यालयीन वर्ग सुरू झालेले आहेत. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत विद्यालयांमध्ये हे वर्ग भरवले जात आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बंद असल्यामुळे या खोल्यांचा वापर करत नववी ते बारावीच्या वर्गासाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत आहे. मात्र आता सर्वच वर्ग सुरू झाले तर शारिरीक अंतराचे पालन करत विद्यार्थ्यांची बसवण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी ज्यादा खोल्यांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी विद्यालयीन व्वस्थापन समितीला त्यावर तोडगा काढावा लागेल.

अंतिम निर्णय चर्चेनंतर ः मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, कृती दलाने जरी २२ नोव्हेंबरपासून ८वीपर्यंतच्या इयत्तांचे वर्ग सुरू करण्याची शिफारस केलेली असली तरी सरकारने अजून त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही. पालिक शिक्षक, राजकीय पक्ष व अन्य घटकांशी या विषयावर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.