येत्या ३६ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता

0
16

पुढील ३६ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील ३६ तासांत राज्यातील विविध भागांत गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काल मंगळवारीही राजधानी पणजीसह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस कोसळला. या बिनमोसमी पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. तर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच भर म्हणून पुढील ३६ तासात राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दरम्यान, मंगळवारी पणजीबरोबरच पेडणे, वाळपई, डिचोली आदी ठिकाणीही जोरदार पाऊस कोसळला. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पाऊस कोसळत आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मात्र, शुक्रवारनंतर राज्यातील पाऊस कमी होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.