निरोप समारंभ

0
292
  • गौरी भालचंद्र

बाईंशी गप्पा मारताना मधली सुट्टी कधी संपायची हेच समजायचं नाही. असे कितीतरी दिवस बाईंशी बोलण्यासाठी आम्ही प्राथमिक विभागात जाऊन गप्पा मारायचो आणि डब्बा खायचा विसरूनच जायचो.

प्राथमिकला असताना पहिली ते चौथीपर्यंत आम्हांला एकच बाई शिकवायला होत्या. त्यांचं नाव सौ. गद्रे बाई. सगळ्या विषयांची ओळख करून देणार्‍या, इतर कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करणार्‍या, सोप्या पद्धतीने गणिताची ओळख करून देणार्‍या आणि नावडत्या विषयाची आवड निर्माण होईल असं भन्नाट काहीतरी सांगणार्‍या आमच्या बाईंना आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, त्यांच्या साड्यांबद्दल आम्ही नेहमीच चर्चा करायचो. बाईंनी केसात गजरा माळला असेल किंवा एकंदर बाईंनी काहीतरी वेगळं केलं असेल तर ते लगेचच आम्हांला समजायचं. कारण आवडणार्‍या व्यक्तीला आपण खालपासून वरपर्यंत न्याहाळत असतो. तशाच आमच्या बाई होत्या, सगळ्यांच्या आठवणींत राहतील अशा.

     आमच्या मस्ती करण्यावर बाई नेहमी आम्हाला धमकावायच्या- ‘‘करा, तुम्ही मस्ती...मी आता शिकवणार नाही’’ या एका वाक्यावर आम्ही लगेच शांत बसायचो. आता तुम्हाला समजणार नाही, पण मोठ्या वर्गात गेल्यावर तुमची गय केली जाणार नाही. माध्यमिकला प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतील, सगळ्या विषयांचा अभ्यास नीट करा, मस्ती करू नका अशा सूचनांची जाणीव बाई पदोपदी करून देत होत्या, 
     निरोप समारंभ जवळ आला होता, प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जाणार यासाठी निरोप समारंभ असतो याची कल्पना होती परंतु पुढच्या पाचवीच्या इयत्तेत बाई आपल्याला शिकवायला नसणार याची कल्पनाच नव्हती. अखेरीस निरोप समारंभाचा दिवस उजाडला. वर्गात आम्ही मस्त अंताक्षरी खेळत होतो, विनोद सांगत होतो, एकमेकांची खिल्ली उडवत होतो, एकंदर खूप मजा करत होतो पण यावेळी बाई आमच्यात फार काही मिसळल्या नाही. बाईकडे बघितल्यावर बाईंचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण आम्हांला काहीच उमगत नव्हतं. त्यादिवशी आम्ही जास्तच दंगा करत होतो तरी बाई आम्हांला ओरडल्या नाही.

काही दिवसानंतर आम्हांला समजलं… त्यादिवशी बाई का शांत होत्या, बाई का रडत होत्या. यापुढे बाई आम्हांला शिकवायला नसणार आणि आम्ही बाईंना त्रास द्यायला नसणार याचं बाईंना वाईट वाटत होतं. बाई आम्हांला शिकवायला नसणार याची जाणीव पाचवीत झाली. मोठ्या वर्गात गेल्यानंतर बाईंची अधिकच उणीव जाणवायला लागली. रोज मधल्या सुट्टीत बाईंना भेटायला जायचो, बाईंशी गप्पा मारायचो आणि रोज आमचा अट्टहास असायचा ‘‘निदान एक विषय तरी शिकवायला या ना बाई.’’
‘‘बाईं, तुम्ही आम्हांला मारलंत तरी चालेल किंवा आम्ही बाई कधीच मस्ती करणार नाही, आम्ही मस्ती केली तर तुम्ही परत आमच्या वर्गात शिकवायला येऊ नका’’… इतपत आमची समजावणी चालली होती. पाचवीच्या वर्गात जाऊच नये असं वाटायचं. मधल्या सुट्टीत परत बाईंना भेटायला जायचो तेव्हा बाईंना म्हणायचो ‘‘बाई निदान पी.टी.चा विषयतरी तुम्ही शिकवा नाहीतर संगणकतरी शिकवायला या’’…असा आमचा नेहमीचा अट्टहास असायचा. बाईंशी गप्पा मारताना मधली सुट्टी कधी संपायची हेच समजायचं नाही. असे कितीतरी दिवस बाईंशी बोलण्यासाठी आम्ही प्राथमिक विभागात जाऊन गप्पा मारायचो आणि डब्बा खायचा विसरूनच जायचो. आमच्या बाईंशी गप्पा मारण्यानेच आमचं पोट भरून जायचं. ..