खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी : विजय

0
74

राज्यातील बंद पडलेल्या खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यास गोवा सरकारला पूर्णपणे अपयश आलेले असून राज्यातील खाणींचा लिलावही जर सरकार करू शकत नसेल व त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची मदत हवी असेल तर ते ह्या सरकारचे मोठे अपयशच म्हणावे लागेल, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. अशाने गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षी गोवा म्हणजे केंद्राची एक वसाहत बनून राहील, असे सरदेसाई म्हणाले.
गोव्यात भाजपचे सरकार आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे, असे असताना केंद्राने गोव्याला सहकार्य करायचे सोडून खाणींचा लिलाव करणे तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही खाणींचा लिलाव करू, असे म्हणणे म्हणजे केंद्र सरकारनेच गोवा सरकारला खाण प्रश्‍न हाताळता येत नाही असे म्हणण्यासारखे असल्याचे सरदेसाई म्हणाले.