क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

0
165
  • डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर)

या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य बिघडेल. चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. म्हणूनच शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जागतिक महामारीच्या काळातही टीबी रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र व राज्य सरकारने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते, कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड-१९ हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. या क्षणी देशात कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. टीबी रुग्णांमध्येही (तसेच आरोग्याच्या इतर परिस्थितींसह) लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. कोविड-१९ लसीकरणाचा हेतू कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे होय. या लसीच्या दुष्परिणामांबद्दल काही लोकांच्या मनात भीती आहे की लसीकरणामुळे त्यांच्या पूर्वीची आरोग्याची स्थिती आणखी बिघडू शकते. त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य बिघडेल. चुकीची माहिती धोकादायक ठरू शकते. म्हणूनच शंका असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वाभाविकच संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम असतेच. तरीदेखील साथीच्या काळात जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक असते अशा वेळी आपल्या शरीराला त्या संसर्गाशी लढा देण्यासाठी काही प्रमाणात आधाराची गरज असते. विशेषत: क्षयरोगाच्या संदर्भात रोगास कारणीभूत असणारे जीवाणू फुफ्फुसात संसर्ग निर्माण करतात आणि श्वास घेण्यास जबाबदार असलेल्या पेशी हळूहळू नष्ट करतात. रोगास आवश्यक प्रतिकार करण्याची शक्ती ही लसीकरणाद्वारे नक्कीच मिळू शकते. रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच रोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारक्षमता या लसीकरणाद्वारे प्राप्त करता येऊ शकते. जेव्हा लसीकरणाच्या दोन किंवा अधिक डोसांचा सल्ला दिला जातो तेव्हा दीर्घ प्रतिरोधक प्रतिसादाची खात्री करणे आणि संसर्गामुळे उद्भवणारी तीव्रता आणि गुंतागुंत कमी करणे हा मुळ उद्देश असतो. अशाप्रकारे टीबीच्या रुग्णांनी (तसेच इतर गुंतागुत असणार्‍या रुग्णांनी) कोविड-१९ संसर्गाबाबत भीती न बाळगता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे इत्यादी सर्व शिफारशी पाळल्या पाहिजेत. शक्य असल्यास सुरक्षित राहणे चांगले.