‘कोविद-१९’मध्ये आचरण…

0
292
  •  डॉ. मनाली म. पवार

जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी हे विषाणू पसरवण्याचे मुख्य माध्यम आहे. पाणी चांगले उकळून प्यावे. पाणी उकळल्याशिवाय पाण्यात औषधी गुणधर्म येत नाही. सगळ्या प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये मग ते कोरोना असले तरी उष्णोदकाला फार महत्त्व आहे.

कोरोना व्हायरस म्हणजेच कोविद-१९ असं आताच त्याचं नामकरण झालेलं आहे, अशा या चायनीज व्हायरसने सगळ्या देशातील जनतेची झोप उडवली आहे. भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले अशी चर्चा आहे. ‘व्हायरस’ म्हटला की त्याचा प्रसार आलाच. म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार झालेला आहे. या व्याधीची लागण होऊ नये म्हणून अगोदरच प्रत्येकाने पाळायचे नियम- आचरण सांगितले आहेत.

कोरोना व्हायरस हा इतर व्हायरसप्रमाणे एक साधारण व्हायरस आहे. हा व्हायरस सर्वप्रथम चीन या देशात उत्पन्न झाला. सध्या लोकांची देवाण-घेवाण, शिक्षण, व्यवहार हे गाव- शहर किंवा देशापुरते सिमित राहिलेले नाही. त्यामुळे या सर्व कारणांसाठी प्रवास हा सतत होत असतो. आपल्या देशातील इतर देशांत किंवा इतर देशातील आपल्या देशात अशी लोकांची रहदारी चालू असते. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या पदार्थांचीही आयात-निर्यात चालू असते. म्हणून अशा परिस्थितीत कुठल्याही आजाराचा प्रसार हाही लवकर व झपाट्याने होत असतो.

कोरोना हा प्रत्येक्षात विषाणूंचा एक मोठा समूह आहे, जो प्राण्यामध्ये सामान्यपणे आढळतो. याचा प्रसार जनावरांपासून मानवापर्यंत पसरला असे यु.एस. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मत आहे. हा नवीन कोरोना व्हायरस हा सार्स विषाणूसारखाच आहे किंवा कुठलेही व्हायरल इन्फेक्शन हे कमी-अधिक प्रमाणात एकसारखेच असते. अगदी आपली सर्दी – हीसुद्धा व्हायरल इन्फेक्शनच आहे. स्वाईन फ्लू, फ्लू, सार्स आणि आता कोरोना कोविद-१९ सगळेच व्हायरल इन्फेक्शन व इतर देशातून संक्रमित झालेले विषाणू आपल्या भारतात अशा प्रकारचा विषाणूचा जन्म झाला, असे फार कधी आढळून येत नाही. कारण आहे आपली भारतीय संस्कृती. अगदी आपल्या खानपानापासून ते राहणीमानापर्यंत आपल्या वर्तणुकीमुळे कुठलेच इन्फेक्शन व्हायरल होत नाही किंवा पसरत नाही.

कुठल्याही प्रकारचे व्हायरस हे मुख्यतः अयोग्य आहार सेवनाने होते. यात महत्त्वाचे आहे मांसाहार सेवन. आयुर्वेदशास्त्रातसुद्धा मांसाहार सांगितला आहे. त्या त्या देशानुसार, तिथे आढळणार्‍या प्राणांनुसार, तिथल्या हवामानानुसार व प्रत्येकाच्या प्रकृती, अग्नीबलानुसार मांससेवन सांगितले आहे. आपल्या शास्त्रात कुठेच कोणतेच अन्न हे कच्चे खायला सांगितलेले नाही. प्रत्येक आहारावर अग्निसंस्कार झाल्याशिवाय किंवा चांगले शिजल्याशिवाय अन्न मनुष्यप्राण्याला पचत नाही. म्हणून कोशिंबिरी, सॅलॅड प्रकार हा तोंडीलावण्यापुरताच सांगितला आहे. हे सॅलॅड आपले मुख्य जेवण होऊ शकत नाही. चीनही अशा देशांमधील एक देश आहे. इथे सर्व प्रकारचे मांस खाल्ले जाते, तेही अर्ध कच्चं, न शिजवता कसंही… मग अशा अवस्थेत प्राण्यांना होणारे इन्फेक्शन किंवा विषाणू संक्रमण मानवाला का होऊ नये? मग हेच इन्फेक्शन ड्रॉपलेट पद्धतीने सर्वत्र जगभर पसरते आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या व्यक्तीचे व्याधीक्षमत्व कमी असते अशा व्यक्तींना विषाणूंची लागण लगेच होते. म्हणून प्रत्येकाने आपली व्याधिप्रतिकारक्षमता एवढी वाढवायची की जगातील कुठल्याही प्रकारच्या व्हायरसने भारतात संक्रमण केले तरी ते व्हायरसचेसुद्धा पचन होईल.

कोरोना व्हायरसची सर्वसाधारण आढळणारी लक्षणे-
– नाक वाहणे
– घसा खवखवणे
– खोकला येणे
– अधुनमधून ताप
म्हणजेच शिंका येणे, दम लागणे, फुफ्फुसात सूज किंवा न्युमोनियासारखे प्राणवह स्रोतस किंवा श्‍वसन संस्थानची लक्षणे या आजारात मुख्यतः आढळतात.

आयुर्वेदानुसार कोरोनाच्या बचावासाठी काळजी….
– आयुर्वेद शास्त्रानुसार सगळ्या व्हायरल इन्फेक्शनसाठी मग तो कोविद-१९ असो वा फ्लू वा सार्स… हे सगळे औपसर्गिक रोगांमध्येच मोडतात. नामकरण कितीही वेगवेगळे केले तरी शेवटी विषाणूच (व्हा.रल इन्फेक्शनच) होय. म्हणूनच औपसर्गिक रोगांची जी कारणे सांगितली आहे त्या कारणांचा नाश करावा म्हणजे् कारणविरोधात आपले आचरण ठेवावे म्हणजे कोरोनाची भीति आपल्याला नाही.
– प्रसंगात गात्र संस्पर्शात् – म्हणजे प्रसंगाच्या वेळी, सण-समारंभामध्ये एकमेकांना मिठी मारणे, शेकहँड करणे टाळावे. आपल्या भारतीय संस्कृतीमधील ‘नमस्कार’ अभिवादनासाठी योग्य आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमध्ये विशेष काळजी घ्यावी.
– कोरोना हा मुख्यत्वेकरून श्‍वसनाचा व्याधी आहे म्हणून सर्दी-खोकला आल्यास आपल्या तोंडावर हात धरावा किंवा आपला रुमाल. आपलं इन्फेक्शन आपल्याकडेच ठेवावे. दुसर्‍यांना देऊ नये. मास्क वापरून ते इतरत्र टाकू नये. सध्या टिश्यू पेपर वापरण्याची फार मोठी प्रथा आहे. पण हा टिश्यू सर्वत्र पसरतो व विषाणूचे प्रसरणही लवकर होते.

– सहभोजनात ः आपल्या संस्कृतीमध्ये उष्टं, एकत्र, एकाच ताटात सगळ्यांनी हात घालून खाण्याची पद्धत आहे म्हणून इतर देशात विषाणूंचा प्रसार वेगाने होतो.
– एका शय्यासनात् ः एकाच ठिकाणी झोपणे किंवा संक्रमित व्यक्तीबरोबर शय्या शेअर करणे किंवा संक्रमित व्यक्तीला भेटण्यासाठी हॉस्पिटल, घरी जाऊन त्याच्या आजूबाजूला गोतावळा करणे म्हणूनच कोरोना व्हायरसबाधित रुग्णांची सुश्रुषा करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष काळजी घ्यावी लागते आहे.
– एकमेकांची वस्त्रे वापरणे, एकमेकांच्या वस्तू वापरणे, मोबाईल, हेडफोनसारखी उपकरणे एकमेकांची वापरण्यानेसुद्धा व्हायरसचे संक्रमण होते.

अशा अनेक कारणांनी व्हायरल इन्फेक्शन होते. या सगळ्या कारणांचा निषेध करणे म्हणजे व्हायरसपासून बचाव करणे.
– नुसते साबणाने हात धुवून व मास्क वापरून आपण कोरोना व्हा.रसचा प्रतिकार करू शकत नाही. गरज नसल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टालावे. सार्वजनिक टॉयलेट्‌सचा वापर करू नये. हात धुतल्यावर बेसिनजवळ लावलेला टॉवेल वापरू नये. बाहेर खाणे टाळावे.

– जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी हे विषाणू पसरवण्याचे मुख्य माध्यम आहे. पाणी चांगले उकळून प्यावे. पाणी उकळल्याशिवाय पाण्यात औषधी गुणधर्म येत नाही. सगळ्या प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये मग ते कोरोना असले तरी उष्णोदकाला फार महत्त्व आहे. मग त्या पाण्याचे गुणधर्म अजून वाढविण्यासाठी पाण्यात तुळशीची चार-पाच पाने, आल्याचा छोटा तुकडा, अर्धा चमचा लवंगा इत्यादी. घालावे म्हणजे कफाचे विलयन व्हायला मदत होते.
– तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये षंडगोदकाला विशेष महत्त्व दिलेले आहे. सगळ्या प्रकारच्या विषाणू संक्रमणामध्ये नागरमोथा, चंदन, सुंठ, काळा वाळा आणि पित्तपापड या द्रव्यांनी सिद्ध पाणी उकळून प्यावे. हे पाणी दीपन- पाचन यांनी सिद्ध होते व याने आमाचे पाचन होते. म्हणून हे पाणी सगळ्या लक्षणांमध्ये उपयुक्त आहे.
तसेच व्हायरसच्या बचावासाठी कापूर, गायीचे तूप यांनी होम करावा. गुग्गुळ, वेखंड, लसूण, निम्ब, करंज अशा झाडांचा गोमयमध्ये घालून धूर करावा.
कोणत्याही प्रकारचा संसर्ग असो, आयसोलेशन हे त्यासाठीच असते जेणेकरून विषाणूचा प्रसार होऊ नये.