कोरोना संक्रमणानंतरचा अशक्तपणा…

0
374
  • डॉ. मनाली पवार

कोरोनानंतरचा अशक्तपणा घालविण्यासाठी आहार हेच औषध आहे. फक्त हा आहार योग्य पद्धतीने, योग्यवेळी घेतला पाहिजे. पहिला नियम म्हणजे भूक लागल्यावर जेवावे. कोरोना होऊन गेला म्हणून चांगले-चांगले जिभेला तृप्त करणारे लगेच खाऊ नका.

सर्दी-तापासारखी लक्षणे असल्यास घरातच थांबून स्वतःच डॉक्टर न होता प्रथम कोविडची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घाबरण्याची गरज नाही. जर आपण आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता त्याचा आकडा मोठा असला तरी मृत्यूची संख्या त्यामानाने खूप कमी आहे. मृत्यूदर वाढण्याचे मुख्य कारण आजार दहा-बारा दिवस अंगावर काढून नंतर डॉक्टरांकडे जाणे होय. म्हणून वेळेतच तपासून औषधोपचार घ्या. डायबेटिक रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने होणार्‍या ह्या आजारामध्ये सर्व रुग्णांमध्ये एकाच स्वरुपाची लक्षणे आढळतात. त्यातील दोषाधिक्य कमी जास्त असते. त्रिदोष दुषित झाले तरी कफाधिक्य असते. तसेच रस, रक्त, ओज हे दूषित होऊन हानी होते. रसवह, प्राणवह व अन्नवह स्रोतस यांमध्ये बिघाड होतो. बर्‍याच रुग्णांमध्ये ताप व सर्दी-खोकल्याने ह्या आजाराची सुरुवात होते. म्हणून सरकारी नियमांनुसार कोविड रुग्णांसाठी जी औषधे देतात ती घ्यावीत, विलगीकरण जे सर्वांत महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर न घाबरता आजाराचा सामना करावा. पुढे अडचण येणार म्हणून किंवा व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी उगाच दूध, बदाम, मासे-मटण, अंड्यासारखे पौष्टीक आहार घेऊ नका, कारण हे सर्व अन्न पचवण्याची शरीराची ताकद नसते, म्हणजे जठराग्नी दूषित झालेला असतो. जोपर्यंत तो ठीक होत नाही, तोपर्यंत खाल्लेले पचणार कसे?

पहिल्या अवस्थेत काय करावे?

आमपचनासाठी सुरुवातीला लंघन करावे. लंघनाने धातुक्षय होणार नाही व वातप्रकोप होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे औषधांबरोबर हलका आहार घ्यावा. आहारामध्ये भाताची वरची पेज किंवा साधारण भूक असल्यास भाताच्या पेजेमध्ये थोडासा मऊ गरम भात किंवा मुगाचे कढण सेवन करावे.

तहान लागल्यावर सतत घोट घोट गरम पाणी प्यावे. ह्या पाण्यात कधी तुळशीची पाने, कधी ओवा, कधी हिंग, कधी लवंग, कधी दालचिनी, कधी बाळशेपा, कधी धणे, कधी जिरा आदि घालून उकळून चांगले गरम-गरम घोट-घोट पीत राहावे.

  • आमपचनामध्ये वातानुलोमन उत्तम व्हावे यासाठी मृदुविरेचन घ्यावे. यासाठी अविपत्तिकर चूर्ण, त्रिफलाचूर्ण, अमलतास चूर्ण आदिंचा वापर करावा. किंवा १ चमचा मध व अर्धा चमचा एरंडस्नेह घ्यावा.
    लंघन केल्याने अग्निसंधुक्षण होण्यास मदत होते व औषधोपचाराचा लाभ होतो.

दुसर्‍या अवस्थेत म्हणजे रुग्णाची सशक्ती जेव्हा रक्ताकडे जाते किंवा अन्नवह स्त्रोताकडे जाते, तेव्हाही लंघन चालू ठेवावे. आरोग्यवर्धीनी, संजीवनी वटी सारखी औषधेही चालू करावीत. दिवसातून दोन-तीन वेळा गूळवेलीचा काढा घ्यावा. सर्दी-खोकला असल्यास सितोपलादी चूर्ण किंवा वटी मधातून किंवा दुधातून घ्यावी. बर्‍याचवेळा रुग्णांना श्‍वसन (प्राणवायू)चा त्रास होत नाही. कोरोना दोन टप्प्यांत असतो. पहिल्या टप्प्यात दोन तीन दिवस ताप व नंतर सर्दी-खोकला, गंधनाश, काहीसा अतिसार अशा रुग्णांनी वर सांगितल्याप्रमाणे आहाराचे नियोजन केले व सरकारी नियमांचे पालन करून औषधोपचार घेतले तर रुग्ण पूर्ण बरा होतो. फक्त एकच लक्षण जे सगळ्यांना हैराण करते व त्रास देते ते म्हणजे बलहानी किंवा अशक्तपणा.

कोरोनानंतर जो अशक्तपणा येतो त्याला काय कराल?

  • कोरोनानंतरचा अशक्तपणा घालविण्यासाठी आहार हेच औषध आहे. फक्त हा आहार योग्य पद्धतीने, योग्यवेळी घेतला पाहिजे.
  • पहिला नियम म्हणजे भूक लागल्यावर जेवावे. वेळ झाली म्हणून कोरोना होऊन गेला म्हणून चांगले-चांगले जिभेला तृप्त करणारे लगेच खाऊ नका. ह्या आजारात अग्नि मंद झालेला असतो. खाल्लेले अन्न पचविण्याची ताकद त्याच्यामध्ये नसते म्हणून चांगली कडकडून भूक लागली म्हणजे जेवावे.
  • तहान लागल्यावर चांगले गरम-गरम चहाप्रमाणे पाणी प्यावे. त्या पाण्यात घरात जे वनस्पतिद्रव्य उपलब्ध असेल ते द्रव्य पाण्यात घालून उकळावे व ते पाणी प्यावे. पाण्यामध्ये तुळशीची पाने, ओवा, लवंग, दालचिनी, मिरी, जिरे, बडिशेप, बाळशेप, ज्येष्ठमध ह्या द्रव्यांपैकी जे असेल ते घालून पाणी उकळावे. रोज वेगवेगळी द्रव्ये घालून पाणी उकळले तरी चालेल. प्यालेले पाणी सुद्धा पचावे लागते. ह्या काळात अग्नी मंद असल्याने भूक लागत नाही. भूक न लागल्याने खाणेही नको होते. तरीसुद्धा ताकद येण्यासाठी अतिरिक्त खाल्ले जाते. परिणामी अपचन, रससक्त-मांसादि सात धातूंचे पोषण व्यवस्थित नाही. ओजक्षयाची लक्षणे दिसतात. ज्याने शरीर मन थकते व अशक्तपणा येतो. मग हा शरीराचा थकवा अग्नीदीपन करणार्‍या आहारांनी करावा व मनाचा थकवा विलांतीने काळ हेच ह्या थकव्याला औषध वेळ द्यावा. हळूहळू आपल्या आरोग्याची गाडी रुळावर येईल.
    लगेच बदाम, दूध, अंडी असा पौष्टीक आहार नको. अग्निसंधुक्षणासाठी तूप उत्तम. रोज सकाळ संध्याकाळ अशक्तपणा कमी व्हायला मदत होते.
  • त्याचबरोबर सर्वांगाला चांगले तेल लावावे. मुख्यतः पायांना स्नेहनानेही अशक्तपणा दूर होतो. – त्याचबरोबर अनुलोम-विलोम, दीर्घ श्‍वसन व आपल्याला जमतात तसे साधे व्यायाम करावेत.
    योग्य आहार, प्राणायाम, व्यायाम, पूर्ण विश्रांती याने थोडासा काळ लोटला म्हणजे कोरोनानंतरचा अशक्तपणा दूर होईल.