ऐतिहासिक मालिका विजय

0
102

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे उत्तुंग भरारी घेतो. त्याच प्रमाणे भारताने भरारी घेत कांगारूंची त्यांची भूमीत जाऊन शिकार करत चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकत झळाळत्या बॉर्डर-गावसकर करंडकावर नाव कोरत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मागील वेळी ऑस्ट्रेलियाला वॉर्नर-स्मिथच्या अनुपस्थितीचे कारण मिळाले होते. आता भारताच्या तिसर्‍या फळीतील गोलंदाजांसमोर गुडघे टेकावे लागल्यामुळे कांगारूंना शरमेने मान खाली घालावी लागली आहे. विराटची पालकत्व रजा, दुखापती, वर्णद्वेषी शेरेबाजी, स्लेजिंग अशा प्रतिकुल परिस्थितीतही टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली आपली सिद्धता दाखवून देत संपूर्ण क्रिकेट जगताला अनन्यसाधारण कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडले आहे.