अमानुष हत्याकांड

0
217

नक्षलवादी क्रूरकर्म्यांनी पुन्हा एकदा रक्ताचा सडा पाडला. स्वयंचलित मशीनगनपासून आईडी बॉम्बपर्यंत अत्याधुनिक हत्यारांचा वापर करीत, जवळजवळ चारशे नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दीड – दोन हजार जवानांना ते परतीच्या प्रवासात असता तिन्ही बाजूंनी घेरून हे निर्घृण हत्याकांड घडवले. क्रौर्य तर एवढे की जखमी जवान आजूबाजूच्या रिकाम्या झोपड्यांत शिरले तर तेथेही हुडकून काढून नक्षल्यांनी त्यांना गोळ्या झाडून आणि भोसकून ठार मारले. काहींना ठार मारण्यापूर्वी त्यांचे हात तोडले गेले. पळणार्‍यांचा पाठलाग करून वेचून वेचून हत्या केली गेली. शस्त्रास्त्रांबरोबरच जवानांचे मृतदेह नग्न करून बुलेटप्रुफ जाकिटे आणि बूटदेखील पळवले गेले. चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या साथीदारांचे मृतदेह तीन ट्रॅक्टरमध्ये भरून नेऊन आपले नुकसान लपवण्याचा बेरकीपणाही नक्षल्यांनी दाखवला. जे घडले ते घडून गेले आहे. आता हे कसे झाले, कोणाच्या कोणत्या चुकीने झाले यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, परंतु पुन्हा एकवार सुरक्षा दलांच्या मोहिमेतील मोठी त्रुटी उघडी पडली आहे हे मात्र खरे! एका परीने नक्षलवाद्यांनी विणलेल्या सापळ्यामध्ये हे जवान पुरेपूर अडकले. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी गेल्यावर तेथे कोणीही नसल्याचे दिसल्यावर परतताना हा सापळा असू शकतो ह्याची जाणीव ठेवून अधिक खबरदारी घेणे गरजेचे होते. वाटेतली दोन गावे रिकामी असल्याचे दिसल्यावर तरी हा संशय बळावायला हवा होता. परतताना झालेली बेफिकिरीच फार महाग पडली असे दिसते.
शहीद झालेल्यांत सर्वाधिक जवान हे स्थानिक जिल्हा राखीव दलाचे आहेत आणि त्याखालोखाल बळी गेला आहे तो सीआरपीएफच्या ‘कोब्रा’ सारख्या सुप्रशिक्षित विशेष दलाच्या जवानांचा. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे हत्याकांड घनदाट जंगलात वगैरे झालेले नाही. सीआरपीएफच्या छावणीपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर जवान परतत असताना हा हल्ला झाला आहे. ह्या उन्हाळ्याच्या दिवसांत बस्तरमधील जंगलांना पानगळ लागलेली असते. त्यामुळेच मार्च ते जुलै ह्याच काळात नक्षलवादी ह्या निष्पर्ण जंगलांत असे हल्ले चढवत असतात, कारण हल्ले चढवल्यानंतर पळून जाणे त्यांना सोपे ठरते.
बस्तर सुकमाच्या जंगलांमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले काही नवे नाहीत. दांतेवाडामध्ये ७६ जवानांचे गेलेले बलिदान अद्याप विस्मरणात गेलेले नाही. कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवरील हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्लांपासून महेंद्र कर्मांसारख्या नेत्यांचा बळी घेणार्‍या, गेल्या वर्षी भाजपचे आमदार भीमा मंडावी यांची सुरक्षा रक्षकांसह हत्या करणार्‍या नक्षलवाद्यांना राजकीय पक्षबिक्ष लागत नाहीत. देश हाच त्यांचा शत्रू आहे आणि नक्षली हे देशाचे शत्रू आहेत. परकीय शत्रूपेक्षा असा अंतस्थ शत्रू अधिक घातक असतो. एकेकाळी ह्याच नक्षल्यांनी मध्य भारतामध्ये विविध राज्यांच्या घनदाट जंगलांमध्ये आपले बस्तान बसवून रेड कॉरिडॉर निर्माण केला होता. आजवरच्या सरकारांच्या अथक प्रयत्नांती अनेक राज्यांत ऑपरेशन ग्रीनहंट खाली धडक कारवाई करून नक्षलवाद्यांचा कणा मोडला आहे. आंध्र प्रदेश, उडिसा, प. बंगालसारख्या राज्यांतून नक्षलवादी जवळजवळ हद्दपार झाले आहेत. त्यामुळे आज हा रेड कॉरिडॉर मोजक्या भागापुरता सीमित उरला आहे. छत्तीसगडचा बस्तर, सुकमा हा आजही त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे आणि सुरक्षा दलांविरुद्धच्या अशा मोठ्या हल्ल्यांसाठी इतर राज्यांतील त्यांचे साथीदारही एकत्र येत असतात हे यापूर्वीही दिसून आले आहे. परवाच्या हल्ल्यामागे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या पहिल्या बटालियनचा नेता हिडमा ऊर्फ हिडमण्णा हा माओवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ह्याचा खात्मा हे आता सुरक्षा दलांचे प्रथम लक्ष्य असले पाहिजे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचा निवडणूक प्राचर दौरा रद्द करून तातडीने छत्तीसगडमध्ये धाव घेतली हा अतिशय योग्य निर्णय आहे. नक्षलवादी कारवायांकडे केंद्र सरकार फार गांभीर्याने पाहते आणि हे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही हा संदेश यातून गेलेला आहे. नक्षलवादाला मोदी सरकारने फार गांभीर्याने घेतले आहे हे यापूर्वीही दिसून आले आहे. पण ह्या नक्षल्यांना आर्थिक रसद पुरविणार्‍या त्यांच्या शहरी बुद्धिवादी म्होरक्यांभोवती कारवाईचे पाश आवळले जातात तेव्हा काहीजण गळा काढत असतात. जी. एल. साईबाबापासून बिनायक सेनपर्यंतच्या अटकेचा इतिहास तपासावा. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जे त्यांच्यासाठी गळा काढत होते, ते आज ह्या हल्ल्यानंतर करकोचाप्रमाणे जमिनीत मान खुपसून कोठे दडले आहेत? शहिदांच्या ह्या बलिदानाप्रती शोक व्यक्त करण्यास आणि नक्षल्यांचा निषेध करण्यास का पुढे होत नाहीत? आदिवासींचे शोषण, उपेक्षा ह्याविषयी सहानुभूती नक्कीच असावी, परंतु त्याचे भांडवल करून अशा प्रकारच्या देशद्रोही कृत्यांत गुंतलेल्या माओवाद्यांची पाठराखण मात्र कोणी करू नये!