Home कुटुंब या जन्मावर या जगण्यावर …

या जन्मावर या जगण्यावर …

0
  • दीपा मिरींगकर

रोजच्या जगण्यात समस्या असणारच. पण कधीतरी थोड्या उंचावरून पहिले की सगळे लहान होत जाईल. एक पिंपळपान तिने मला आणि मी तिला दिले भेट म्हणून आणि आमची एक छोटीशी भेट संपली.

रोजच्या धावपळीत गडबडीत शांत बसावे वाटले तरी तेवढा वेळ नक्कीच नव्हता. संसारातील आणि नोकरीतील जबाबदार्‍या वयाबरोबर आणि माझ्या स्वत:च्या वाढत्या वजनाबरोबर तशाच वाढत होत्या. तरीही कधीतरी वेळ काढायलाच हवा म्हणत असताना एका जिवलग मैत्रिणीचा ङ्गोन काय येतो आणि आम्ही दोघी अगदी अल्लड वयातील मुलीं(?)सारख्या ङ्गिरायला काय गेलो. केवळ दोन तासांसाठी. तेही सायंकाळी ५ ते ७ पर्यन्त. जवळच्या एका मंदिरात.

माझी मैत्रीण आणि मी अगदी वेगळ्या परिस्थितीत मोठ्या झालो. ती गर्भश्रीमंत तरीही सौम्य, ऋजु आणि हसतमुख. तर मी अगदी मध्यम वर्गातील, थोडीशी अबोल आणि न हसणारी. पण आमची मैत्री मात्र अखंड. आम्ही अगदी कधीतरी भेटतो, आपल्या कोणत्याही अडचणी, त्रास कटकटी यांविषयी न बोलता आपल्या मुलांचे कौतुक, सामाजिक कामातील एखादा आनंदाचा अनुभव, कोणत्यातरी जुन्या सुखद आठवणी एकमेकांना सांगतो आणि मुख्य म्हणजे एखाद्या ङ्गालतू विनोदाला अगदी पोटभरून हसतो. मोकळा वारा पितो. आणि पुन्हा एकवार आपल्या जगात समस्येला भिडत जगतो.

यावेळी अगदी कोविडकाळातसुद्धा भेटलो. जवळजवळ सहा-सात महिन्यांनंतर. एका जगन्नाथ मंदिरात. ङ्गार्मागुडीच्या डोंगरावर उंच कड्याशी एक छोटे मंदिर अलीकडेच बांधले असावे. पुरीच्या मंदिरातील ङ्गोटो असतात तशा बलराम, सुभद्रा आणि कृष्ण अशा एका लाकडी ओंडक्याच्या पण सजवलेल्या मूर्ती. त्याच्या आरतीसाठी थांबलेले पंडित जेव्हा आरती करून निघून गेले तेव्हा त्या शांत हवेशीर मंदिरात होतो ते पाचजण. तीन देव आणि आम्ही दोन माणसे. त्या उंच डोंगरावरून बांदोड्याचे महालक्ष्मी मंदिर, नागेश मंदिर आणि रामनाथ मंदिर अगदी देखणे दिसत होते. वारा मस्त वाहत होता. एवढ्या उंचावर गेले की नेहमीच आपण किती खुजे आहोत आणि रोज आपल्याला भेडसावणार्‍या समस्या किती नगण्य आहेत याची जाणीव होते. मला यासाठी समुद्रसुद्धा आवडतो. समुद्रकिनारी अगदी काही क्षण निःशब्द बसलो की लाटा, वाळू, वारा सगळे बोलू लागतात. आपला क्षुद्रपणा जाणवतो. इथे झाडे, डोंगर, वारा आणि समोर असलेला जगन्नाथ सारेच बोलत होते. काही वेळ शांत बसल्यावर आपोआप डोक्यातील कल्लोळ शांत झाला. मग आम्ही बोलू लागलो. काही आठवणी, मजेशीर विनोद, चुटकुले आणि असेच काही अर्थपूर्ण काही अर्थहीन. जुन्या पण आनंदी आठवणी, कधीचे सांगायचे राहिलेले किस्से असे सारे एकमेकींना सांगताना हसलो. पिंपळ वृक्षाजवळून कुठ्‌ठाळी पूल पाहिला. एवढ्या उंचावरून सारे जग अगदी लहान मुठीएवढे दिसत होते आणि आमच्या जगातील काळज्या कटकटीसुद्धा तशाच छोट्या होत गेल्या.

कधीतरी असे आपल्याकडेच पाहायला पाहिजे आणि जुन्या पण हसर्‍या आठवणी एकमेकांना सांगायला पाहिजेत. मन मोकळे करायला एका ठराविक वयानंतर घरातील माणसे पुरेशी नसतात. जुन्या बालमैत्रिणी तर लग्नानंतर भेटतही नाहीत. भेटल्या तरी जग बदललेले असते. संसारात पडल्यावर सुरवातीला सखा, मग लेकरे बाळे, त्यांची दुखणी खुपणी, त्यांच्या शाळा, अभ्यास परीक्षा, त्यांच्या संगीत- नृत्य- खेळ या सार्‍या इतर पण अत्यावश्यक गोष्टी यात वेळ सरतो. त्याचवेळी आपले आणि नवर्‍याचे वयोवृद्ध पालक, त्यांची आजारपणे, काळाबरोबर न बदलणार्‍या समज-गैरसमजाच्या वावटळी यात सारे दिवस संपून जातात. आपल्या मनीचे गुज सांगायला आणि अर्थात ऐकायला वेळ नसतो, गरजही भासत नाही. तेव्हा हवी असते एक सखी समजून घेणारी, समजणारी. केवळ बोलूनच काही वेळा खूप समाधान वाटते. आपल्या सांसारिक अडचणी सोडवायच्या असतात आपल्यालाच. पण त्या अडचणी आहेत एवढे मानून घेणारे कोणी आहे एवढेच पुरेसे असते.

रोजच्या जगण्यात समस्या असणारच. पण कधीतरी थोड्या उंचावरून पहिले की सगळे लहान होत जाईल. एक पिंपळपान तिने मला आणि मी तिला दिले भेट म्हणून. ‘इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे….. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’….. अशी एक सुरेल लकेर तिने घेतली आणि आमची एक छोटीशी भेट संपली.