॥ बायोस्कोप ॥विलगीकरण…अलगीकरण…सलगीकरण

0
232
  • प्रा. रमेश सप्रे

‘विलगीकरण – अलगीकरण’ याची सवय होणं हे अंगवळणी पडणे मानवी जीवनासाठी अगदी घातक आहे. वेळीच सतर्क- सक्षम- सक्रिय होऊन मानवी समाजजीवनाचा नि भावविश्‍वाचा ‘सलगीकरण’ पक्षी आनंदाच्या आकाशात उडता ठेवला पाहिजे. त्याचे दोन पंख विलगीकरण- अलगीकरणाचे असले तरी लक्ष्य मात्र असलं पाहिजे भावनिक सलगीकरणाचं!

‘बायोस्कोप’मध्ये केवळ मनोरंजन करणारी सिनेमासारखी चित्रं पाहात नाही आहोत. तर स्वतःच्या देहातली – गेहातली (घरातली) – समाजातली आरोग्यचित्रंही बघत आहोत.
कोरोना विषाणुमुळे जगभर फैलावलेली कोविड-१९ महामारी (पँडेमिक) कमी होत असताना त्याच विणाणूचा समाज संक्रमणाच्या (कम्युनिटी ट्रान्समिशन) दृष्टीनं अधिक भयंकर प्रकार अनेक देशांना ग्रासू लागलाय. उंदरांच्या माध्यमातून पसरणारा हंता व्हायरस हा विषाणू हळूहळू पसरु लागलाय. एकूण चित्र असंच दिसतंय की इथून पुढच्या काळात नव्यानव्या अधिकाधिक जहरी प्रभाव असलेल्या विषाणूंशी सार्‍या मानवजातीला सामना करावा लागणार आहे.

याचाच अर्थ कोविड-१९ संबंधात घ्यावयाची काळजी यापुढे कायमची घ्यावी लागणार, अशी चिन्हं दिसताहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे ती रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी). एका बाजूनं ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अन् कोविड् मर्यादेत राहावा म्हणून घ्यावयाची रोगप्रतिबंधक काळजी अशा दोन्हींचा विचार आवश्यक आहे. नाहीतर वरच्या नळातून टाकीत पाणी पडतंय पण त्याचवेळी खालचा नळ उघडा आहे, अशी परिस्थिती निर्माण होईल. याला एक तिसरी बाजूही आहे जिचा आपण प्रामुख्यानं विचार करत आहोत, ती म्हणजे- मनाची प्रतिकारक शक्ती म्हणजे सामर्थ्यवान, शक्तिमान मन!
कोविडसंदर्भात आपण मुखावरण (मास्क) घालणं्, सतत हात- चेहरा जंतुरहित (सॅनेटाइझ) करत राहणं आणि सामाजिक अंतर राखणं ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. भविष्यकाळातही या त्रिसूत्रीचं महत्त्व कमी न होता वाढतच जाणार आहे.

विलगीकरण हा शब्द ‘क्वारंटाइन’ला समानार्थी म्हणून वापरला जातो. त्याचप्रमाणे सोशल डिस्टंसिंगला सामाजिक अंतर या शब्दाऐवजी ‘अलगीकरण’ शब्द वापरता येईल. कोविड् झाल्यानंतर माझं विलगीकरण केलं जातं. अगदी घरात असलो तरी स्वतंत्र खोलीत राहणं (होम क्वारंटाइन) आवश्यक असतं.
तुम्ही म्हणाल हे तर सर्वांनाच माहीत आहे. खरंय हे. पण दीर्घकाळ हे करावं लागल्याने दोन परिणाम जाणवू लागलेयत. पहिला परिणाम म्हणजे आता सुरुवातीचं गांभीर्य आपल्या कृतीत राहिलेलं नाही. दुसरा अधिक चिंताजनक परिणाम म्हणजे याचा आपल्या मनोवृत्तींवर, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ लागलाय. हाच खरा आपल्या या सहचिंतनाचा विषय आहे.

सामाजिक अलगीकरणाचा सर्वाधिक प्रभाव पडला तो आपल्या एकमेकांकडे जाण्यावर, एकत्र येण्यावर, छोटे छोटे समारंभ ‘गेट टुगेदर’ साजरे करण्यावर. लॉकडाउनच्या काळात तर याचा कळस झाला. खाजगी डॉक्टरांची सेवा, ब्युटी पार्लर्स, हॉटेल्स, जवळजवळ सर्व छोटे मोठे व्यवसाय जिथं चार माणसं एकत्र येणं अपेक्षित होते ते बंद झाले. अगदी नाइलाजानं औषधांसाठी फार्मसीत जावं लागलं तर तिथंही विशिष्ट अंतर राखल्यामुळे प्रतीक्षेत उभं राहण्याची शिक्षा (की तपश्‍चर्या) करावी लागायची.

आता परिस्थिती बर्‍यापैकी निवळत असताना आपल्या गेलं सुमारे वर्षभर असलेली आपली ‘विलग- अलग’ जीवनशैली बदलली पाहिजे. यासाठी काय करता येईल?-

  • ‘गेल्या ८-१० महिन्यात मी कुठंही गेलो नाही नि माझ्याकडेही कुणी आलं नाही?’ असे अनेकजण म्हणतात ते ठीक आहे. पण हा ‘आपद्धर्म’ (म्हणजे आपत्तीत- संकटकाळी वागण्याची पद्धत) होता की इष्टापत्ती (म्हणजे संधी असलेलं संकट)?
    उदा. * लग्नं- मुंजीसारख्या समारंभांची सुट्टी असल्यामुळे तिथं उपस्थित राहण्याची कटकट वाचली.
  • वीक-एंड कार्यक्रमांचा खर्च वाचला पण ‘आउटिंग’ची मजा विरून गेली.
  • सारं व्हर्च्युअल् (आभासी) करायची सवय लागली. प्रत्यक्ष (रिअल्) अनुभवातलं थ्रिल गेलं.
  • पहिल्या काही महिन्यांनंतर कंटाळा, एकटेपणा, औदासिन्य यांचा अनुभव नित्याचा झाला.
  • अगदी आई-वडीलांचं अंतदर्शन, अंत्यसंस्कार करणं अशक्य होऊन बसलं.
  • बंद शाळा उघडणं अशक्य झाल्यामुळे ऑनलाइन शिकणं- शिकवणं स्विकारावं लागलं.
  • लॉकडाउनच्या आरंभी सुरू केलेले व्यायामप्रकार, छंद इ. एकसुरी, कंटाळवाणे बनू लागले.
    ही यादी आणखीही वाढवता येईल. पण आता आणखी हा काळ वाढला तर मात्र या नकारात्मक गोष्टींची जागा सकारात्मक, विधायक गोष्टींनी, सवयींनी घ्यायला हवी. उदाहरणार्थ- * आभासी जीवनाशी अगतिकपणे तडजोड करायला नको. म्हणजे सारंच काही पडद्यावर (ऑन् स्क्रीन) करायला नको. जसं, व्हिडिओ कॉल, किंवा स्काइप यांचा उपयोग करून ‘विशु, कपाळ कर तुझं इकडं!’ असं आशूनं म्हटल्यावर विश्‍वासानं कपाळ समोर करायचं नि आश्लेषानं त्यावर हळदकुंकू लावायचं. ‘मीही लावते हं!’ असं विशूनं म्हणून करायचे. नंतर ‘यावर्षी मी लुटायला मोठा टिफिन कॅरियर आणला. तीन डब्यांचा. उगीच छोट्या डब्या देऊन काय उपयोग? ‘घे हे. विशू, मी प्रेशर कुकरच आणलाय लुटण्यासाठी. घे हं!’

मग मोबाइलच्या पडद्यावर ही सांस्कृतिक देव-घेव होते. कितीही बायकांना एक टिफिन- एक कुकर पुरतो. ना हो? – यावर उपाय म्हणजे आजुबाजूच्या पाच सुवासिनींना बोलवायचं नि आपणही आवर्जून जायचं. संस्कारांवर कोविडला विजय मिळवू द्यायचा नाही. (यावर्षी अजूनही १५ दिवस हळदीकुंकू करता येईल.)
इथं मुद्दा हळदीकुंकवाचा नाही तर आभासी आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या सुवर्णमध्याचा आहे.

  • असाच सुवर्णमध्य निवासी वसाहती, कामाच्या जागा, मंदिरासारख्या संस्था यातून साधता येईल. आयोजन सर्व प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेऊन करावं. पण… ‘आधी केलेचि पाहिजे’ हे खरं नाही का?
  • शाळांच्या व्यवस्थापनानं नि शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना शालामाईपासून फार काळ दूर न ठेवण्यासाठी विचारमंथन, कल्पक उपक्रमशीलता यांचा प्रयोग करणं आवश्यक आहे. हे अशक्य नाही.
    ‘विलगीकरण – अलगीकरण’ याची सवय होणं हे अंगवळणी पडणे मानवी जीवनासाठी अगदी घातक आहे. वेळीच सतर्क- सक्षम- सक्रिय होऊन मानवी समाजजीवनाचा नि भावविश्‍वाचा ‘सलगीकरण’ पक्षी आनंदाच्या आकाशात उडता ठेवला पाहिजे. त्याचे दोन पंख विलगीकरण- अलगीकरणाचे असले तरी लक्ष्य मात्र असलं पाहिजे भावनिक सलगीकरणाचं!