सेना-भाजप युतीत नेतृत्वावरून वाद

0
102

महाराष्ट्रात गेली २५ वर्षे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी भाजपचे नेतृत्वावरून मतभेद काल ठळकपणे समोर आले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, या सेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विधानास भाजपने असहमती दर्शविली.
मुख्यमंत्री सत्ता आल्यानंतर ठरेल असे भाजपने काल स्पष्ट केले. २००९च्या निवडणुकीत सेना-भाजपमध्ये अनुक्रमे १६९ व ११९ असे जागावाटप झाले होते. पण यावेळी समान जागावाटप व्हावे, असा आग्रह भाजपने धरला आहे.
दुसरीकडे, अधिक जागांची हाव मैत्री तुटण्यास कारणीभूत ठरू शकते, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनाच ठरवेल, असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. तर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात युतीच्या सरकारचे नेतृत्व भाजपच करेल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौर्‍यावेळी आधीच हे स्पष्ट केले असल्याचे भंडारी म्हणाले.