>> मुख्यमत्र्यांची ग्वाही
राज्य सरकार लॉकडाऊनवर गंभीरपणे विचार करत असून सर्वांशी चर्चा करून येत्या दोन तीन दिवसांत सारासार विचार करून लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेऊ असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. लॉकडाऊनबाबत भाजपच्या आमदारांसोबतआयोजित केलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, आताच भाजपच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बहुतेक आमदारांनी राज्यात लॉकडाऊन लावावा अशी मागणी केली आहे. मात्र लॉकडाऊनबाबत सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेऊ. यावेळी फक्त भाजपच्या आमदारांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कॉल सेंटर उभारण्यास सांगितले आहे. त्याद्वारे त्या त्या भागातील रुग्णाला लागेल ती मदत करावी. इस्पितळात दाखल करावयाचे झाल्यास त्यांना रुग्णवाहिकेचीही सोय करून द्यावी. याबाबत सर्व जबाबदारी कॉल सेंटरने घ्यावी असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.