सलग दुसर्‍या दिवशी राज्यात शून्य कोविड बळी

0
25

>> नवे ४४ रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ७७३ वर

कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ४४ रुग्ण काल राज्यभरात सापडले. दिलासादायक बाब म्हणजे काल कोविडमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सलग दुसर्‍या दिवशी राज्यात शून्य कोविड बळींची नोंद झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात ८५ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने आता राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ७७३ एवढी झाली आहे.

गेल्या २४ तासांत ३०५८ जणांची कोविडसाठी चाचणी करण्यात आली, त्यापैकी ४४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. राज्यात कोविड संसर्ग दर हा १.४४ टक्के एवढा आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के एवढे आहे.

राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३१७ एवढी आहे. गेल्या २४ तासांत १० रुग्णांना इस्पितळातून घरी पाठवण्यात आले, तर इस्पितळात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही १२ एवढी आहे.

मडगावात शंभरहून अधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक रुग्ण मडगाव शहरात असून, त्यांची संख्या ११० एवढी आहे. अन्य सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षेतील रुग्णांची संख्या ५० च्या खाली आहे. मडगाव पाठोपाठ पणजीत सर्वाधिक ४७ रुग्ण आहेत.