भारताच्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे २ सैनिक ठार

0
113

शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद व त्याची पत्नी ठार झाल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या जोरदार प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले तर ५ नागरिकांचा मृत्यू झाला. या गोळीबारात पाकिस्तानचे पाच सैनिकही जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराने शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईवेळी भारतीय पाकिस्तानची एक चौकी आणि दोन बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात पाकचे दोन सैनिक मारले गेले. तसेच पाचजण जखमी झाले. ठार झालेले पाकिस्तानचे सैनिक २४ फ्रंटइयर फोर्स युनिटचे होते. त्यांना पूँछच्या चक्का दा बाग व खारी कारमारा येथे सीमेपलीकडे तैनात करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी करण्यात आलेल्या गोळीबारात एकाच परिवाराच्या दोन जणांचा मृत्यू झाला होता व काही जखमी झाले होते. पाकिस्तानी लष्कराने उखळी तोफा व अत्याधुनिक बंदुकांनी भारतीय लष्कराच्या चौक्या व सीमेजवळील लोकवस्ती असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करीत तुफान गोळीबार केला होता.
त्यात पूँछच्या मेंधरमध्ये गोळीबारादरम्यान एक जवान व त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्या तीन मुलींना दुखापत झाली होती.
भारतीय सैन्य ठोकणार
डोक्लाममध्ये मुक्काम
नवी दिल्ली : दरम्यान, सिक्किम सीमेवर भारत – चीन दरम्यान तणाव कायम असून भारतीय सैन्याने चीन, भारत व भूतानच्या सीमेवरील डोक्लाममध्ये दीर्घकाळ तळ ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. चीनकडून वारंवार भारतीय सैन्याने डोक्लाम सोडावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, जोपर्यंत चिनी डोक्लाममधून माघारी हटत नाहीत, तोपर्यंत भारतीय लष्कर डोक्लाम सोडणार नाही असा खणखणीत इशारा भारताने दिला आहे.