फडणवीस दौर्‍याचे फलित

0
37

भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवशीय गोवा भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला नवी ऊर्जा आणि चेतना देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसून आला. त्याचबरोबर मायकल लोबोंपासून प्रतापसिंह राणेंपर्यंत सर्वांना थेट भेटून, चर्चा करून गोव्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. आमदार, मंत्र्यांशी त्यांच्या समोरासमोर झालेल्या चर्चेमधून प्रत्यक्ष जमिनीवरच्या बर्‍याच गोष्टी त्यांना निश्‍चितच कळल्या असतील. त्यामुळे हे सगळे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून भाजपाला आगामी विधानसभा निवडणूक सुकर व्हावी ह्या दृष्टीने काय करता येईल त्याची एक आक्रमक रणनीती आखण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
फडणवीस यांच्या गोवा भेटीतील वक्तव्यांमधून काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाजपला यावेळी समोर उभ्या असलेल्या मोठ्या आव्हानांची पुरेपूर जाणीव झालेली आहे. एक तर सरकारला अँटी इन्कम्बन्सीचा सामना यावेळी करावा लागणार आहे. त्यातच कोरोना महामारीतील सरकारची उडालेली भंबेरी, खाण प्रश्नासारखे न सुटलेले प्रश्न, राज्याच्या जनतेवरील आर्थिक संकटे, महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक विषय सरकारला अडचणीत आणणारे आहेत. त्यातच आम आदमी पक्षाने उदंड घोषणाबाजी करून या निवडणुकीची समीकरणेच उलटीपालटी करून टाकलेली आहेत. त्यामुळे काहीही करून सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची पक्षाची तयारी झालेली दिसते. केवळ जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवारांची निवड करण्यापासून ते आयत्या जागा जिंकून देणार्‍यांना मुक्तहस्त देईपर्यंत भाजप कोणतीही कसर यावेळी ठेवणार नाही. शिवाय केंद्रीय पातळीवरही भाजपाला गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका जिंकणे अतिशय महत्त्वाचेच आणि प्रतिष्ठेचेच नव्हे, तर पक्षासाठी राष्ट्रीय अस्तित्वाचे ठरणार आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड त्यांना आपल्या हातून काहीही झाले तरी निसटू द्यायचे नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही एखादा मोठा धमाका ह्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झाला तर आश्चर्य वाटू नये.
गोव्यात आम आदमी पक्षाने घोषणांची जी आतषबाजी चालवलेली आहे, त्यातून भाजपचे सत्तासिंहासन कितीही नाही म्हटले तरी हळूहळू डळमळू लागले आहे. त्यामुळे आपली बलाढ्य प्रचारयंत्रणा मैदानात उतरवून सरकारप्रतीची नकारात्मकता नाहीशी करण्याची धडपड भाजपला येत्या काळात करावीच लागेल. पक्षपातळीवरील ‘सेवा और समर्पण’ सरकारी पातळीवरील ‘स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ यासारख्या उपक्रमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याची जोरदार धडपड पक्षाने चालवलेली आहे, कारण कोरोना महामारीच्या लाटांमध्ये जनता आणि सरकार यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली असल्याचे पक्षनेत्यांना उमगले आहे. त्यामुळे जनसंपर्क अभियान राबवून घरोघरी जाऊन सरकारप्रती सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आकाशपाताळ एक करण्याचा प्रयत्न सध्या सरकारने चालवलेला आहे. बाबूशच्या भरवशावर पाच, लोबोंच्या मदतीने चार, विश्वजितचे दोन, कवळेकरांचे दोन असे हिशेब मांडून ‘मिशन २२’ साकारण्याची पाळी भाजपावर आज आलेली आहे.
पक्षामध्ये यावेळी अपरिहार्यपणे बेदिली आणि बंडाळीचे वारे वाहात आहे. त्यामुळे सगळे निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल असे सांगून कॉंग्रेससदृश्य एका नव्या ‘हायकमांड’ संस्कृतीला भाजपने सध्या स्वीकारलेले दिसते. याचे अर्थात काही फायदे आहेत. वर घेतल्या जाणार्‍या कोणत्याही निर्णयाविरुद्ध बोलण्याची टाप स्थानिक इच्छुक उमेदवारांमध्ये नसेल. तसे बोलणे म्हणजे राजकीय संन्यास घेणे ठरेल याची त्यांना नक्कीच जाणीव आहे. मनोहर पर्रीकरांची उणीव पक्षाला यावेळी भासते आहे. पर्रीकर असते तर सर्व निर्णय स्थानिक पातळीवर घेऊन वरिष्ठांची केवळ मोहोर त्यावर उमटवली गेली असती. यावेळी सगळे निर्णय वरून खाली पोहोचवले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला आपल्या उमेदवारीची शाश्‍वती नाही. भाजपला एकाकी झुंज देणे यावेळी कठीण आहे याची जाणीव झालेली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात समविचारी मगो पक्षाशी हातमिळवणीसाठी हात पुढे केला जाऊ शकतो. मगोही त्यामुळे सध्या कुंपणावर आहे. स्वबळाचे सरकार येणे कठीण असल्याने निवडणुकोत्तर हातमिळवणी आणि गेल्यावेळच्या सारख्या फोडाफोडीच्या यौजनाही तयार ठेवल्या जातील असे दिसते आहे. विरोधी पक्षांची एकजूट राज्यात होऊ शकलेली नाही हाच काय तो भाजपसाठी दिलासा आहे.