प्राणशक्ती वाढवण्याची गरज

0
185
  • डॉ. मनाली म. पवार
    सांतइनेज- पणजी

तुळशीच्या पानांचा ५-१० ग्रॅम रस, गायीच्या तुपातून चाटल्यास २-३ दिवसात न्युमोनियासारख्या आजारात आराम मिळतो. म्हणजे साहजिकच कोरोना बाधित रुग्णांना फुफ्फुसाच्या दुष्टीमध्ये आराम मिळणारच. तसेच तुळस प्राणवायुचा स्रोत असल्याने तुळशीची रोपे आपल्या घराच्या आजुबाजूला लावावीत.

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक राज्यांसह गोव्यातही सक्तीचे लॉकडाऊन करावे लागले, कोरोनाची ही दुसरी लाट चिंतेची बाब ठरते आहे. मुळात कोरोनाची ही दुसरी लाट म्हणण्यापेक्षा कोरोनाचा संसर्ग वाढण्याला आपण जनताच तर कारणीभूत नाही ना? कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे असे वाटत असता आपण सगळे नियम धाब्यावर बसवले व जसा काही ‘कोरोना’ हा विषाणू अस्तित्वातच नाही असे पूर्ववत आचरण, विहार सुरू केला. प्रत्येक वेळी सरकारने नियम घालून देण्यापेक्षा, प्रत्येकाने आपले हित कशात आहे ते पहावे. प्रत्येकाने आपली व आपल्या प्रियजनांच्या स्वास्थ्याची काळजी स्वतःच घ्यावी.

गेल्यावर्षी मार्चनंतर जेव्हा कोरोनाचा संसर्ग भारतात सुरू झाला तेव्हा कोरोना या विणाणूबाबत विशेष माहिती नव्हती. प्रत्येक डॉक्टर, वैज्ञानिक आपल्या परीने त्याचे संशोधन करीत होते. कोरोना विषाणू, त्याचा संसर्ग, संसर्गाची लक्षणे व औषधोपचार हे सगळे सर्वांनाच नवीन होते. पण आता एका वर्षानंतर कोरोना संसर्गाची बरीच लक्षणे डॉक्टरांना, तसेच आम जनतेलाही समजायला लागली आहेत. त्यावर औषधोपचारही यशस्वीरित्या होत आहे. लसीकरणही चालू आहे. तरीसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेच आहे. मृत्यूदरामध्ये होणारी वाढ ही चिंता वाढवणारी समस्या आहे.
बरेच जाणकार कोरोना म्हणजे साधी सर्दी आहे असे सांगतात. पण आपण सर्वच लहानपणापासून ऐकत आलो आहोत ‘सर्दीने काय कुणी मेलेला नाही पण सर्दीसारखे आजारही नको’. पण ह्याच सर्दीने ‘इन्फ्लुएन्झा’ने पूर्वी बाहेरच्या देशात मृत्युमुखी पडले आहेत. तसेच काहीसे कोरोनाचे आहे. शेवटी साधारण सर्दीची लक्षणे जरी असली तरी कोरोनाने मृत्यू होण्याची संख्या वाढतेच आहे.

शिंका येणे, खोकला येणे, घसा दुखणे, वास न येणे त्याचबरोबर श्‍वास घ्यायला त्रास होणे म्हणजेच (ऑक्सीजनची पातळी कमी होणे) ही सर्रास दिसणारी लक्षणे कोरोनात आढळतात. म्हणजेच हा श्‍वसनसंस्थेचा आजार आहे, जो आपण आपल्या प्राणवह स्रोतसाचे बल वाढवून व आपली व्याधीप्रतिकारशक्ती वाढवून या आजारावर मात करू शकतो.
कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून सर्वप्रथम चिकित्सा म्हणून काय करावे..?

  • तर घाबरू नये. ‘भीती’ आजारपण जास्त गंभीर करते. ह्या आजारात जे महत्त्वाचे लक्षण ‘ऑक्सीजनची पातळी कमी होणे’ जे दिसते त्याचेही मुख्य कारण ‘भीती’ आहे. तिला दूर ठेवा आणि आपल्याला प्राणवायू (ऑक्सीजन) कमी पडतो ना मग तो घेण्याचा प्रयत्न करा. भय, क्रोध, शोक आदी कारणांनी मनोवह स्रोतसाची दुष्टी झाल्यास त्याच्या परिणामस्वरूप प्राणवह स्रोतसाचीही दुष्टी होत असते. तसेच हा प्राणवह स्रोतसाचा आजार आहे म्हणजे कफभूपिष्ट व्याधी होय. यामध्ये कफाचीही दुष्टी होते व हा कफ श्‍वसनसंस्थेमध्ये अवरोध उत्पन्न करतो. या अवरुद्ध कफामुळेही श्‍वास घ्यायला त्रास होतो.
    ‘तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नका’. अजूनही आपल्या हातात वेळ आहे. आपल्या प्राणवह स्रोतसाची ताकद वाढवा.
  • मास्क लावा
  • सामाजिक अंतर पाळा.
  • गरजेशिवाय घराबाहेर पडू नका.
  • सॅनिटायझरचा उपयोग वारंवार करा.
  • हलका व्यायाम, योगासने करा.
  • शांत झोप घ्या.
  • घरात- बाहेर धूपन करा. घरच्या घरी होम-हवन करा.
  • घरात व बाहेर वातावरण स्वच्छ व प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा.
    या सगळ्या नियमावली गेले वर्षभर तुम्ही ऐकत असाल. कितीजण त्याचा अवलंब करतात, माहीत नाही. पण ज्यांनी ज्यांनी त्याचे पालन केले त्यांना बहुतेक कोरोनाची लागण झालेली नसावी.

प्राणवह स्रोतसाला विशेष बळ देण्यासाठी –
सध्या या काळात, हा योग्य काळ आहे – वमन घ्यावे. चांगल्या वैद्याच्या सल्ल्याने वमनाने शरीर शोधन करून घ्यावे.

  • श्‍वास वेग वाढला असता लवण मिश्रित तेल छातीला लावावे व गरम पाण्याने शेकावे (स्वेदन द्यावे) म्हणजे कफ पातळ होतो व स्रोतोरोध सुटतो व आपली श्‍वास घेण्याची क्षमता वाढते.
  • प्राणवह स्रोतसाला बळ देण्यासाठी चौसष्टी पिंपळी- आमलकीचे विविध कल्प हे फुफ्फुसाला बळ देणार्‍या द्रव्यांत अग्रगण्य समजले जातात. च्यवनप्राशावलेह, धात्री अवलेह हे विशेष लाभदायी ठरतात.
  • आहारात द्रव, उष्ण, लघु, दीपन-पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात हवीत. लसूण व आले दररोज आहारात जरूर असले पाहिजे.
  • स्नान व पानासाठीही गरम पाणी वापरावे.
  • ‘लक्ष्मीविलास’ यासारखे प्राणवह स्रोतसावर कार्यकारी, विशेषतः हृदयावर बल्य क्रिया करणारे कल्प आपल्या घरात ठेवा.
  • तसेच वैद्याच्या सल्ल्याने सितोपलादी चूर्ण, गुडूची, ज्येष्ठमध, नागकेशर, त्रिकटू, हिंग्वाष्टकसारखी औषधेही घरात असावी. म्हणजे काही लक्षणे दिसल्यास वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.
  • प्राणवायूचा योग्य पुरवठा मिळण्यासाठी तुळस, निम्ब, वडादी पंचवल्कलाचा खूप मोठा फायदा होतो.
  • तुळशीच्या पानांचा ५-१० ग्रॅम रस, गायीच्या तुपातून चाटल्यास २-३ दिवसात न्युमोनियासारख्या आजारात आराम मिळतो. म्हणजे साहजिकच कोरोना बाधित रुग्णांना फुफ्फुसाच्या दुष्टीमध्ये आराम मिळणारच. तसेच तुळस प्राणवायुचा स्रोत असल्याने तुळशीची रोपे आपल्या घराच्या आजुबाजूला लावावीत. तसेच प्रत्येकाने रोज चार-पाच पाने खावीत. किंवा आता सध्या तुळशीच्या पानांच्या रसाचे ड्रॉप्स बाजारात मिळतात. तेसुद्धा रोज ४-५ थेंब पाण्यातून सेवन केल्यास आराम मिळतो. आपली प्राणवायूची पातळी वाढायला मदत मिळते.
  • निम्ब हेही वनस्पती द्रव्य सर्वांच्या घरी असणे गरजेचे आहे. विज्ञान कडूनिम्बाला इम्यूनोमेड्युलेटर म्हणून ओळखते, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचे स्वयं-नियमन करण्याची क्षमता आहे. कडूनिम्बाची पाने अँटी-ऑक्सिडन्ट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. ही वनस्पतीदेखील प्राणवायू जास्त प्रमाणात देते.

वड, पिंपळ, औदुंबर, प्लक्ष यांसारख्या मोठ्या वृक्षांच्या खाली बसण्याने भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळतो. गावामध्ये असे मोकळ्या हवेत या वृक्षांखाली बसून प्राणवायू घेता येतो पण शहरात तुळस, कडुनिम्बाचा नक्की वापर करू शकता.

  • प्राणवायू शरीरात घेण्यासाठी, साठवण्यासाठी प्राणायामाचा खूप फायदा होतो. एका श्‍वास आत घेण्याच्या क्रियेपासून (प्राण) पुढील श्‍वास घेण्याच्या कालामधील अंतर शक्यतितके वाढवीत जाणे (आयाम). याला प्राणायाम म्हणतात. मनाचा व प्राणाचा अन्योन्य संबंध असल्यामुळे प्राणनियंत्रणाबरोबरच आपोआप मनोनियंत्रण साधते व या सर्वांचा उचित असा स्वास्थ्यपोषक परिणाम मिळतो.

उचित मात्रेत प्राणवायू मिळण्यासाठी उजव्या हाताने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने पूर्ण उच्छ्वास सोडावा. नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून १६ मात्रांपर्यंत श्‍वास आत घ्यावा. त्याच्या चौपट वेळ म्हणजे ६४ मात्रांपर्यंत श्‍वास आत कोंडून धरावा व नंतर ३२ मात्रांपर्यंत सावकाश उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. नंतर ही क्रिया उलट प्रकारे म्हणजेच उजवी नाकपुडी प्रथम बंद करून याप्रमाणे करावी व अशाप्रकारे आलटून पालटून करीत रहावे.

  • योगासनांमध्ये पश्‍चिमोत्तानासन, भुजंगासन तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सिंहासन हे प्राणवायूचा स्रोत वाढवण्यास विशेष उपयुक्त आहे.

प्राणवायूची जी समस्या सध्या सतत कोरोनाबादित रुग्णामध्ये दित आहे, त्यावरून सर्वांनी प्राणवह स्रोतस सशक्त ठेवण्याची गरज भासते आहे.