पाक सैनिकांच्या हल्ल्यास भारताचे चोख प्रत्युत्तर

0
72

चार पाक सैनिकांना कंठस्नान
नियंत्रण रेषेनजीक गेल्या २४ तासात दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला भारताने तोडीस तोड उत्तर दिल्याने पाकने नमते घेतले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाक रेंजर्सच्या चौघाजणांना ठार केले. मात्र त्या आधी भारतालाही एका जवानाला गमवावे लागले. सैनिकांचे मृतदेह मिळवण्यासाठी पाकने पांढरे निशाण फडकावले आहे.सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाक रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर देत चौघांना टिपले. परिणामी युद्धजन्य परिस्थितीतील नियमांचे पालन करणे पाकला भाग पडले. त्यासाठी शरणागतीचे पांढरे निशाण त्यांच्यातर्फे फडकाविण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांच्या खंडानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैनिकांनी काल भारतीय लष्कराच्या एकूण ८ चौक्यांवर हल्ला केल्याने सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. जम्मूतील सांबा क्षेत्रातील एका चौकीनजीक गस्त घालणार्‍या भारतीय जवानांच्या तुकडीला पाक सैनिकांनी लक्ष्य करून गोळीबार केला. त्यात रामसिंह हा जवान शहीद झाला. याआधी पाक सैनिकांनी गेल्या १८ व २७ रोजी दोन ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.