पश्‍चिम बंगालात तृणमूल; ममता पराभूत

0
147

>> पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे अखेर काल निकाल जाहीर झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये अखेर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाने बाजी मारत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. मात्र नंदिग्राममध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १७३६ मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत २१३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर आसाममध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार करत स्पष्ट घरवापसी केली आहे. ३० सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरीमध्ये भाजप बहुमतापासून दोन जागांनी मागे आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने १४१ जागी आघाडी घेतली असून केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमत दिले आहे.

ममतांचा १७३६ मतांनी पराभव
नंदिग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली. नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री – तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांचा त्यांचेच एकेकाळचे सहकारी – भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी १७३६ मतांनी पराभव केला आहे.

ममता-शुभेंदूंत लक्षणीय लढत
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वात चर्चित लढत ठरली ती मुख्यमंत्री-तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यातील. ही लढत इतकी चुरशीची ठरली की मतमोजणीच्या १५ व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारींहून २७०० मतांनी पुढे होत्या. तर १६ व्या फेरीअखेरीस त्यांच्यात केवळ ६ मतांचा फरक उरला होता.

जनतेचा निकाल मान्य पण
न्यायालयात जाणार ः ममता

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत तृणमूल कॉंग्रेसच्या विजयासाठी जनतेचे आभार मानले. हा देशाचा निकाल आहे. आज देश जिंकला आहे. नंदिग्रामच्या जनतेचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे पण निकालात फेरफार झाल्याची माहिती आमच्याकडे असून या संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे ममतांनी सांगितले. तसेच या ठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणीही ममतांनी केली आहे.

तृणमूल कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत
पश्‍चिम बंगालमध्ये २९४ जागा असून दोन मतदारसंघात मतदान रद्द करणत आले आहे. त्यामुळे २९२ जागांवरील निकाल जाहीर झाले असून बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४८ जागा तृणमूल कॉंग्रेसने सहज प्राप्त केल्या असून २१३ जागांवर त्यांनी कब्जा केला आहे. तर कडव्या लढतीची अपेक्षा असलेल्या भाजपला मात्र ७७ जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी कॉंग्रेस आणि डाव्यांनी केलेल्या आघाडीचा धुव्वा उडाला असून त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

आसाममध्ये भाजपची घरवापसी
आसाम राज्यात भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज करत घरवापसी केली आहे. मतमोजणीत सुरवातीपासून भाजपने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. आसाममध्ये १२६ जागा असून बहुमतासाठी ६४ जागांची गरज आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करत ७५ तर कॉंग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे.

केरळमध्ये पिनराईंनी घडवला इतिहास
केरळ विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या पक्षांनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीतून तयार झालेल्या सत्ताधारी ‘लेफ्ट डोमोक्रेटिक फ्रंट’ला (एलडीएफ) निर्णायक आघाडी मिळाली आहे. यंदा सलग दुसर्‍यांदा पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफला सत्ता मिळाली. एकूण १४० जागांपैंकी ७१ जागा बहुमतासाठी आवश्यक असून एलडीएफने ९७ जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यूडीएफ ४१ तर एनडीएला २ जागा मिळाल्या आहेत.

तामिळनाडूत द्रमुकची बाजी
तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात अगदी अटीतटीची लढत दिसत होती. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली. द्रमुकने १५४ जागांची तर सत्ताधारी अण्णाद्रमुकने ७७ जागांची आघाडी घेतली.

पुदुच्चेरीत भाजप बहुमताजवळ
३० सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत पुदुच्चेरीत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता कायम आहे. भाजपने १६ जागांवर तर कॉंग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. पुद्दुचेरीत अपक्ष ६ जागांवर आघाडीवर आहे.

फेरमतमोजणीची
मागणी फेटाळली

पश्‍चिम बंगालमधील लक्षवेधी ठरलेल्या नंदिग्राम मतदारसंघात तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळत फेरमतमोजणी करण्यास नकार दिला आहे.

पंतप्रधानांकडून ममतांचे अभिनंदन
तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर भाजपने पश्चिम बंगालमधील पराभव स्वीकारला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचे अभिनंदन. केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू’, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.