दीर्घायुष्यासाठी ‘योग’

0
839
  • नीलांगी औ. शिंदे

योग हा मनुष्य जीवनाचा महत्त्वाचा व अविभाज्य घटक आहे. योगासने, प्राणायाम यांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थासाठी योगाभ्यासाची गरज आहे. जीवन कितीही व्यस्त असू दे पण आपल्या विकासासाठी काही वेळ प्रत्येकाने स्वतःसाठी हा काढलाच पाहिजे. हीच काळाची गरज आहे.

काल जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी योग दिवस साजरा करण्यामागे पारंपरिक व वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. या दिवशी सूर्य आपली स्थिती बदलतो. उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. सूर्य दक्षिणेकडे सरकत असल्याने त्याचा प्रकाश व उष्णता कमी होत जाते आणि यामुळे वातावरणातही बदल जाणवतो. या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे जीव- जंतू सक्रीय होत असतात. त्यामुळे माणसं आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. योगासने, प्राणायाम यांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थासाठी योगाभ्यासाची गरज आहे. मनुष्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शरीराचा, मनाचा आणि आत्म्याचा विकास घडवायचा असेल तर योगसाधना हे उत्तम साधन आहे. योगसाधना केल्याने शरीर निकोप आणि दणकट बनते, मन उत्साही आणि कृतिशील बनते. मुख्यतः कुठल्याही संकटात, कठीण प्रसंगात मन शांत ठेवून प्रसंगाला धिराने, संयमाने तोंड देण्याची उमेद प्राप्त होते. शिस्त, आत्मविश्‍वास, आत्मनियंत्रण हे गुण अंगी बाणतात. योगाभ्यास माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतो, असा विश्‍वास असल्याने योगाचा प्रसार संपूर्ण विश्‍वभर व्हावा व त्याच्या सादरीकरणासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस मनवण्याचे निश्चित करण्यात आले.

आजकाल आपण पाहतो औषधे कोणतेही रोग समूळ नष्ट न करता, दबवून ठेवतात. औषधांच्या सततच्या मार्‍याचाही दुष्परिणाम जीवघेणा असतो. योगक्रिया, प्राणायाम, योगासनांमध्ये या रोगांचा समूळ नाश करुन शरीरामध्ये ताकद, उत्साह आणि प्रतिकारशक्ती विकसित करण्याची क्षमता आहे… हे सत्य आता संपूर्ण जगापर्यंत पोचल्यामुळेच ते योगाभ्यासाकडे ओढले जात आहेत. काही गोष्टींसाठी योग जुळून यावा लागतो, त्याचेच हे एक उदाहरण आहे.

योग हा अत्यंत प्रभावशाली जीवनशैलीचा प्रकार आहे, ज्याच्या योगे शरीराच्या विविध अवयवांमधले आणि अंतरमनामधले संतुलन राखले जाते. आजच्या धकाधकीच्या आणि गतिमान जीवनशैलीमध्ये रखडत – रखडत माणसाचं आयुष्यसुद्धा अत्यंत कमी होत चाललंय. योग प्रसाराच्या निमित्ताने माणसाचे आयुष्य दीर्घ व्हावे अशीही कामना आहे.
२७ सप्टेंबर २०१४ या दिवशी नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेमध्ये प्रस्ताव मांडला की योग भारतीय परंपरेची एक बहुमुल्य अशी देणगी आहे. योग मनुष्य आणि निसर्ग यांच्यामधील सामंजस्य वाढवतो. शरीर आणि मन यांच्या एकतेचं ते प्रतीक आहे. योगात विचार, संयम आणि आरोग्य यांचा संगम असून बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी योग मानवाला मदत करतो. १९३ सदस्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. १७७ देशांनी पाठिंबा दर्शविला आणि अवघ्या ९० दिवसांत २१ जून हा आतंरराष्ट्रीय योग दिवस असावा अशी घोषण केली. चार वर्षे योग दिवस सर्वत्र तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.

आज आपण पाहतो, आपल्या अवती-भवती इतके आजार पसरलेले आहेत की त्यांची गणना करणेही कठीण. कॅन्सर तर विषवल्लीसारखा कानाकोपर्‍यात फैलावलेला आढळतो. मधुमेह, संधीवातासारखे आजार युवावर्गामध्ये सर्रास दिसून येतात. इतकंच काय तर पक्षाघात, हृदय विकाराचा झटका हेसुद्धा खूप कमी वयामध्ये लोकांना येताना आपण पाहतो. कारण एकच की लहानपणापासूनची आपली जीवनशैली, आपला आहार- विहार आणि प्रदूषण यांमुळे नको ते घटक इतक्या सुक्ष्म पद्धतीने माणसाच्या शरीरामध्ये वाढताहेत की असे अकाली आजार होऊन मृत्यूचं प्रमाणदेखील वाढलंय.
माणूस डॉक्टर- औषधं- रुग्णालये यांच्या कुचक्रामध्ये फसत चाललाय. या जाळ्यात अडकून प्रकृती सुधारत तर नाहीच पण भारंभार पैसा खर्च होतोय, मानसिक ताण वाढतोय. आपली माणसं आपल्यापासून दुरावत चाललेली आहेत याचं दुःख, धावपळ यात होणारी फरफट, त्यात माणूस जीवंत राहील याची शाश्‍वती नाहीच.
असे कायम स्वरुपाचे आजार मागे लागण्यापेक्षा योग्य वेळी जर शरीरच सक्षम बनवलं तर काही अंशी हे कुचक्र थांबवता येईल. औषधांचा मारा, फास्ट फूड, हानीकारक पेये, चरबी वाढवणारे पदार्थ, पाण्यामधून होणारा रसायनांचा मारा, शेतामधून अन्नधान्य, फळे- भाज्या यांच्यावरील रासायनिक प्रक्रिया माणसाला रोज अक्षरशः विष पाजत असतात.

या सगळ्यापासून आपण हेच समजाचयं की आपण काय खातो- पितो, आपल्या मुलांना काय खायला देतो याकडे कसून लक्ष असलं पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. आपल्याबरोबर त्यांना सुद्धा व्यायाम, योगासनं-प्राणायाम यांची गोडी लावली पाहिजे. पालकांनी हसत – खेळत, अत्यंत सहजपणे या सवयी मुलांमध्ये बिंबवल्या पाहिजेत.

खरं तर आपल्या प्रत्येक कृतीमधून आपण योग आचरत असतोच. आपले मित्र, स्वकीय, नातेवाईक समोर आले की आपण हात जोडून नमस्कार करतो, मस्तक नमवतो, काही वेळा कमरेत वाकून पादस्पर्श करतो. प्रसंगी गळाभेट करतो, छोट्यांना छातीशी कवटाळतो, ईश्‍वराला धन्यवाद देण्यासाठी हात आकाशात फैलावतो. या सर्व घटना मानवाच्या अंतःकरणातील भाव-भावनांचे प्रकटीकरण करतात. प्रत्येक कृतीमध्ये अंतःकरणाचे अस्तित्व मानून जर कार्य केलं तर त्या सुद्धा निखळ आनंद देणारा योगच आहेत.

आजच्या काळात आपण भौतिक सुखांसाठी, काही फसव्या क्षणिक सुखांच्या मागे जीव तोडून धावत आहोत, मानसिक ताणतणाव, आपल्या जीवनामध्ये घुसलेली गतिमानता यामुळे मनुष्य जीवंतपणी मरण आणि तेही चुपचाप राहून अनुभवत आहोत. या सर्वांमधून थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे तीस – चाळीस मिनिटं चालून पाहा, साधारणतः साडे तीन हजार पावले चालणं होतं. पूर्णतः तणावरहीत आणि मोकळं- मोकळं वाटतं. व्यायाम होतो. संधीवात, हृदयरोग, मधूमेहासारखे आजार पण आपण थोपवू शकतो. यासाठी मात्र मनापासून वेळ काढावा लागेल.

बैठी कामें करणार्‍या व्यक्तींनी तर प्राणायाम, योगासने, चालणे- धावणे, पोहणे, सुर्यनमस्कार यांसारख्या व्यायामांसोबत पुरेशी विश्रांती, सहा- सात तास झोप, योग्य आहार यांचा अवलंब करणे काळाची गरज आहे. काही सुक्ष्म व्यायाम जे शरीर शिथिल करतात ते करून श्‍वसनावर लक्ष देऊन सूर्यनमस्कार घालणे हेसुद्धा सहज शक्य आहे. १५ ते २० मिनिटे याला, नंतर प्राणायाम आणि मग उत्साही मनाने दिवसाची सुरुवात करणे सहज शक्य आहे.

शरीराचे शिथिलीकरण यामध्ये मानेपासून पायाच्या घोट्यापर्यंत सर्व सांधे मोकळे करता येतात. यामध्ये सर्व सांधे उजव्या व डाव्या बाजूने गोल फिरवणे, ताण देणे असे केल्यानंतर उभ्याने करायची आसने ज्यामध्ये ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन यांसारखी आसने सहज, सोपी व आबाल वृद्ध असे कुणीही करु शकतात.

बैठ्या आसनांमध्ये भद्रासन, अर्धउष्ट्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन यांसारखी आसने जी अत्यंत सोपी आहेत ती करु शकतो. पालथं पडून करायच्या व्यायामांमध्ये भुजंगासन, शलभासन, मकरासन, कूर्मासनासारखी आसने, सेतूबंधासन, पवनमुक्तासन आणि शेवटी शवासन. शरीर पूर्णपणे शांत झाल्यावर सुखासनात किंवा पद्मासनात बसून किंवा वज्रासनात बसून श्‍वसनाचे म्हणजे प्राणायाम प्रकार करायचे. यामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी हे प्रकार करुन शरीर शिथिल करून ज्ञानमुद्रेत अंगठा व तर्जनीची टोकं दांबून धरुन मन एकाग्र करावं. मनात येणारे विचार काढून टाकावेत. मन एकाग्र करुन कोणतीही हालचाल न करता बसावे. शेवटी तीन वेळा ओंकार ध्यान करावं.. ओंकार झाल्यावर दोन्ही हात एकमेकांवर घासून पंजाचा मधला भाग डोळ्यांवर ठेवावा व डोळे उघडावेत, हात चेहर्‍यावर फिरवावा आणि चेहर्‍यावर प्रसन्न हास्य ठेवावं. अत्यंत हलकं – हलकं वाटायला लागतं.

योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक शाळांसाठी, संस्थांसाठी आणि सर्वांसाठी या पाच प्रकारचे व्यायाम करावेत असं सूचवलं गेलं. यामधून हृद्योगाचे सर्व प्रकार सहजपणे आत्मसात करता येतील, ज्यायोगे मुलांमध्येच नव्हे तर आम्हा सर्वांना शक्ती, बळकटी, लवचिकता व चिकाटी प्राप्त होऊ शकते. पण शरीराची हालचाल करताना अत्यंत हळूवारपणे, काळजीपूर्वक आणि लयीत केली पाहिजे. मनावर कुठलाही ताण- तणाव, दडपण, काळजी, घिसाडघाई करता कामा नये.

योगाभ्यास मुलांमध्ये स्पर्धा वाढवीत नाही, पण उच्च गुणवत्ता प्राप्त करण्याची ओढ निर्माण करतात. आंतरिक शिस्तीची जाणिव वाढते. शरीराच्या उर्जानिर्मितीच्या प्र्रक्रियेला योगाभ्यासामुळे उत्तेजन मिळते. योगसाधनेमुळे शरीराचे ताण- तणाव कमी करता येतात, रक्तपुरवठ्याला चालना मिळते, सतत येणारा थकवा दूर होतो, माणसाच्या शरीराचा व मनोवृत्तीचा समतोल, त्याचा लवचिकपणा, जोम, उत्साह या सर्वांत योगसाधनेद्वारे भर पडते. माणसाच्या कार्यक्षमतेचा विकास होतो व एकाग्रचित्त होण्याची क्षमता वाढते.
योग हा मनुष्य जीवनाचा महत्त्वाचा व अविभाज्य घटक आहे. जीवन कितीही व्यस्त असू दे पण आपल्या विकासासाठी काही वेळ प्रत्येकाने स्वतःसाठी हा काढलाच पाहिजे. हीच काळाची गरज आहे.