क्रीडा खात्याच्या सेवेतून काढून टाकलेले महिला कर्मचारी उपोषणास बसल्याने त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बल्बांचे वितरण करीत आहेत. या कर्मचार्यांना काम दिले असते तर त्यांच्या घरात उजेड पडला असता, असे सांगून ६३ कर्मचार्यांना सरकारने दया दाखवावी, अशी मागणी प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष सुनिता वेरेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
उपोषणकर्त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यावेळी त्यांनी उपोषणास बसल्याने नोकर्या मिळणार नाही, असे त्या महिलांना सांगितले होते, असे त्या म्हणाल्या. गेल्या अनेक दिवसांपासून क्रीडा खात्यातील रोजंदारी कर्मचारी कमी केल्याने उपोषण आंदोलन करीत आहेत. दोघा महिला कर्मचार्यांनी प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेतले आहे. पत्रकार परिषदेस स्वाती केरकर, सावित्री कवळेकर, ऐश्वर्या साळगावकर, ज्योती गावकर व मुक्तमाला फोंडवेकर उपस्थित होत्या.