शुभंकर जोग
जीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी
- मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला शाळा- कॉलेजमध्ये जाता येत नाही आणि सगळं ऑनलाइन झालंय. त्यामुळे खूप नुकसान होतंय आपलं. या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षक -विद्यार्थ्यांची भेट नाही होत. त्यांना जर काही कळलं नाही तर विचारणार कसं? कारण आधीसारखं समोर बसून शिकवणी घेता येत नाही. त्यामुळे लक्ष देत आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही. ऑनलाइनमुळे आपले शाळेतले मित्र भेटत नाही; नवीन मित्र होत नाहीत. शाळेत मज्जा करायचे दिवस घरात बसून घालवावे लागतात. ऑनलाइन पद्धतीमुळे मुले तासन् तास मोबाईल- लॅपटॉप समोर राहतात, त्यामुळे डोळे खराब होणे, डोकेदुखी, चिडचिडेपणा हे दिसून येतं. ज्यांच्याजवळ मोबाइल नाही किंवा ज्यांच्या घरी नेटवर्कच मिळत नाही त्यांच्यासाठी हे ऑनलाइन शिक्षण खूप त्रासाचं.
हं, आता या ऑनलाइनमुळे आपला प्रवासाचा वेळ वाचला. आपल्या घरात आरामात आपल्याला हवं तसं बसता येतं.
कोरोनापासून वाचायचं असेल तर सरकारने घातलेले नियम पाळले पाहिजेत- मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरून हात कायम धुणे, जास्त गर्दी न करणे, कारणाशिवाय घराबाहेर न पडणे, दोन्ही लसींचे डोस घेणे. हे सगळं पाळलं तर आपण नक्कीच या महामारीतून लवकर बाहेर येऊ शकतो.
खुशी नाईक
बीए-३, खांडोळा महाविद्यालय, माशेल
‘कॉलेज लाइफ’ या शब्दातूनच त्यातली मजा आणि स्फूर्तीचा अंदाज येतो. किती उत्साहानं सर्व मुले कॉलेजसाठी जायची. पण आता कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाल्यामुळे मुलांमधील हा उत्साह जणू नाहीसा झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा काही मुलांना फायदा झाला तर काहींना नुकसान. शिक्षक आणि मुलांमधील संपर्क तुटला आहे. मुले क्लास चालू करून ठेवतात आणि खेळायला जातात किंवा जेवायला जातात. अशाप्रकारे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. काही मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये शिकवलेलं समजत नाही तर काहींना नेटवर्क गेल्यामुळे अर्धवट समजतं. यात फायदा त्या मुलांचा झाला ज्यांना कष्ट केल्याशिवाय पास होता आलं.
सगळ्यात जास्त काही गमावलं असेल तर ते मित्र-मैत्रिणींना भेटणे. आमच्यामध्ये होणार्या गप्पा-गोष्टी; थट्टा-मस्करी जे या ऑनलाइन क्लासमध्ये नाही.
क्लास ऑनलाइन असल्यामुळे महाविद्यालयातर्फे विविध वेबिनार आयोजित केले होते. त्यातून खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली आणि खूप काही नवीन शिकता आलं.
तेजल तुलसीदास नाईक,
बी.एस.सी. बी.एड.-३, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, हरमल.
महाविद्यालयीन काळ म्हणजे मुलांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा. कारण याच कालावधीत युवक आपल्या आयुष्यातील पुढील ध्येय निश्चित करतो. या कोरोना महामारीच्या दरम्यान नेमका हाच काळ आम्ही गमावून बसलो. कॉलेज विश्व म्हणजे युवकांसाठी आनंदोत्सव, जो महाविद्यालयाच्या सान्निध्यात राहून अनुभवणे ही जीवनातील खास अशी स्मृती आहे. तब्बल दोन वर्षे घरी संगणकाच्या स्क्रीनवर डोळे वटारून जबरदस्तीने आत्मसात केलेले शिक्षण आता नकोसे वाटू लागले आहे. महाविद्यालयाच्या पवित्र वातावरणात शिक्षक व मित्रांच्या अभ्यासू मैफलींमागे मन आता रुंजी घालते आहे. घरात राहून काही काळापुरते सुरक्षिततेचे कवच जरी आम्ही कमावले असले तरी महाविद्यालयाच्या वातावरणातून अलिप्त राहून आम्ही बरंच काही गमावलं आहे.
कोरोनापासून बचाव करण्याकरता जो पौष्टिक आहार आपल्या शरीराला हवा होता तो मात्र घरी राहूनच आपण चांगल्या प्रकारे उपभोगला. पण आता कोरोनाची दारे हळूहळू बंद होत असल्याने महाविद्यालयाची दारे उघडतील या आशेकडे आम्ही डोळे लावून आहोत. आता एकच पर्याय – एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर, स्वच्छता, पौष्टिक आहार व एकमेकांची काळजी घेऊनच घराचा उंबरा ओलांडायचा.
प्राजक्ता दादू परब
एम्. एस्सी.- १, ज्ञानप्रसारक कॉलेज अँड रिसर्च सेंटर, आसगाव-म्हापसा
कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षण अनपेक्षितपणे सुरू झाले, ज्याचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत. एका बाजूने प्रवासामुळे होणारी दगदग आणि दुपारचे अनियमित जेवण यातून सुटका झाली होती. प्रवासखर्च व वेळ वाचला. आपले घर वर्गखोली बनले. डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारताना उत्साह वाढला. शिक्षण व संबंधित क्षेत्रे जवळ आल्याचा आनंद झाला. पण काही विषय असे असतात की ते कितीही प्रयत्न केला तरी ऑनलाइनवर अवघड ठरतात. काही भागात योग्य नेटवर्क मिळत नाही. या पद्धतीमुळे शिस्त, अभ्यासाचे गांभीर्य राहत नाही. व्यावहारिक अनुभव व प्रात्यक्षिकेे ही शिक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. पण येथे मात्र त्यांचा अभाव दिसतो. एखादा विषय शिकवून झाल्यावर त्यावर मित्र-मैत्रिणींत प्रत्यक्ष चर्चा करणे, शिक्षकांना आपल्या समस्या विचारणे यातून विषयाचे आकलन सहजतेने होते. परंतु ऑनलाइनमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सजीवता नाही. व्हिडिओमुळे रटाळपणा वाढतो. हे निश्चितच धोकादायक आहे.
विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात योग्य समन्वय ठेवून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. आता हळूहळू कॉलेजचे क्लासेस सुरू होत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांनी समर्थपणे आपल्यासमोरील आव्हानांना सामोरे गेले पाहिजे.