केजरीवालांच्या अटकेच्या आडून राज्यातील भंडारी समाज लक्ष्य

0
5

भंडारी समाजाच्या डिचोली शाखेच्या सचिवांचा आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे निमित्त साधून सत्ताधारी भाजप गोव्यातील भंडारी समाजाला आता लक्ष्य करू लागले असल्याचा आरोप काल आपचे नेते व भंडारी समाजाच्या डिचोली शाखेचे सचिव राजेश कळंगुटकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

2022 साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्यावेळी भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी जो पक्ष भंडारी समाजातील व्यक्तींना जास्त प्रमाणात उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे भंडारी समाज खंबीरपणे उभा राहील, असे म्हटले होते. आणि या आवाहनाला अनुसरून आपने भंडारी समाजातील व्यक्तींना जास्त प्रमाणात उमेदवारी दिली होती. परिणामी भंडारी समाजातील बऱ्याच लोकांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला होता. त्याचा वचपा काढण्यासाठीच भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यासह चार नेत्यांना ईडीकडून समन्स पाठवण्याचे काम सत्ताधारी भाजपने केल्याचा आरोप कळंगुटकर यांनी केला.

भंडारी समाजावर दबाव आणण्यासाठीच चार नेत्यांची चौकशी सुरू केली असून, चौकशीचा हा ससेमिरा असाच चालू राहिल्यास त्याचे परिणाम भाजपला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा देताना राज्यात भंडारी समाजाची टक्केवारी ही 33 टक्के एवढी आहे हे कुणीही विसरू नये, असेही राजेश कळंगुटकर म्हणाले.

आपचे नेते वाल्मिकी नाईक काय म्हणाले?

हे दोघेच जण 2022 सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. ईडीने चौकशीसाठी बोलावलेले अन्य दोघे जण म्हणजे दत्तप्रसाद नाईक व अशोक नाईक यांचा आम आदमी पक्षाशी काहीही संबंध नाही. ते दोघे कधीही आपचे सदस्य नव्हते. या दोघा नेत्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलावले हे एक गुढच आहे, असे आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी काल पणजीतील पत्रकार परिषदेत सांगितले