काश्मीरातील जी-20 बैठकीवर पाकचा आक्षेप

0
8

जम्मू-काश्मीरमध्ये जी-20च्या बैठकीवर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. हा काश्मीर मुद्द्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर यूएन चार्टरनुसार तोडगा निघायला हवा आणि जोपर्यंत हा तोडगा निघत नाही, तोपर्यंत पाकिस्तान विरोध करत राहील असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने शुक्रवारी जी-20 चे इव्हेंट कॅलेंडर जारी केले होते. यानुसार, यूथ-20 ची बैठक एप्रिल व मे महिन्यात श्रीनगर, लेह आणि लडाखमध्ये होईल, असे स्पष्ट केले होते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारत केवळ स्वतःच्या समाधानासाठी अशा कृती करत आहे. काश्मीरशिवाय लेह आणि लडाखमध्येही भारताने जी-20 बैठकांचे नियोजन केले आहे. काश्मीर दोन्ही देशांतील एक वादाचा मुद्दा आहे. म्हणून इथे होणाऱ्या बैठकांची आम्ही निंदा करतो. या बैठकी जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यात भारत यशस्वी होऊ शकणार नाही, असेही पाकने म्हटले आहे.