काळा पैसा भारतात परत आणणारच : पंतप्रधान

0
105

‘मन की बात’मध्ये आश्‍वासन
भारतीय नागरिकांनी विदेशातील बँकांमध्ये दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणणार असल्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिले.
‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे मोदी यांनी देशवासियांशी काल सुसंवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. या संवादा दरम्यान त्यांनी या प्रकरणी असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘माझ्यावर विश्‍वास ठेवा. भारतातील गरिबांचा जो पैसा बाहेर गेला आहे, त्या पैशाची पै-पै भारतात परत आणीन हा आपल्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न आहे’ असे मोदी यावेळी म्हणाले.
‘विदेशी बँकांमध्ये भारतीयांचा किती पैसा साठलेला आहे याविषयी नेमके कोणालाच माहीत नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने आकडेवारी देतात. मात्र आमचे सरकार असा सर्व पैसा भारतात आणण्यास वचनबध्द आहे. मला आकडेवारीत गुंतून रहायचे नाही. मात्र गरिबांचा पैसा भारतात परत यायला हवा. त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते मी करणार’ असे मोदी यांनी स्पष्ट केले.