काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानसाठी

0
7

>> आसाम मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने 5 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसकडून जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, या जाहीरनाम्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदार टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतासाठी नसून पाकिस्तान देशासाठी असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा हल्लाबोल केला होता. त्यानंतर काल रविवारी मुख्यमंत्री सरमा यांनी जोरदार टीका केली. ते आसामच्या जोरहाटमध्ये माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेस द्वेषाचे राजकारण करत असून आम्ही त्याचा निषेध करतो. काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतातील नसून पाकिस्तानातील निवडणुकांसाठी आहे. समाजात फूट पाडून सत्तेत येण्याची काँग्रेसची मानसिकता आहे. मात्र, आसाममधील लोकसभेच्या सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री सरमा यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींचीही टीका
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे दिसून येते. जाहीरनाम्याचा काही भागावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसतो. आज जी काँग्रेस उरलेली आहे, त्या काँग्रेसकडे राष्ट्रहिताची काहीही ध्येयधोरणे नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली होती.

काँग्रेसचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध करताना त्यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते बेदब्रत बोरा यांनी, हिमंता बिस्वा सरमा अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण त्यांना पक्षाचे मुख्य विचार समजू शकले नाही. त्यामुळेच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.