उन्हाळ्यातील दिनचर्या कशी असावी?

0
601

–  डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

आत्ताचे तप्त वातावरण पाहता किंवा उन्हाळ्याचा ताप पाहता, आत्ताच्या ऋतुचर्येप्रमाणेच सगळ्यांनी दिनचर्येचे पालन करणे गरजेचे आहे. आता क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींनी तसेच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांनी तसेच इतर जनसमुदायानी या उन्हाळ्यात आहार-विहाराचे खालीलप्रमाणे आचरण करावे…

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवले असले तरी भारतात इतर देशांच्या अपेक्षेने या कोरोनावर बर्‍यापैकी मात केली आहे. सरकारने या कोरोना व्हायरसच्या महामारीत योग्य ती पावले उचलली आहेत. ती योग्य प्रकारे राबविल्याने व लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे जिवीत हानी बर्‍यापैकी टळली आहे. आर्थिक नुकसान जरी पुष्कळ प्रमाणात झाले असले तरी मृत्युदर मात्र त्या तुलनेत खूप कमी आहे. शेवटी ‘आरोग्यं ही धनसंपदा’. त्यामुळे आरोग्याचे रक्षण करणे हे परम कर्तव्य.

भारतातील बरीच राज्ये सध्या ‘ग्रीन झोन’खाली येत असल्याने या राज्यात ‘लॉकडाऊन’मध्ये थोडी शीथिलता आणली गेली आहे. चाकरमानीही दुसर्‍या राज्यातून स्वगृहाला येण्यासाठी उत्सुक आहे. सरकारनेही त्यांना जाण्यास परवानगी दिली आहे. त्यातच सूर्यनारायणही तप्त झाला आहे. खरंच, या चाकरमान्यांनी घरी यावे का? हा जीवघेणा प्रवास करून येण्यापेक्षा आहे तिथे प्रत्येकाने सरकारचे सगळे नियम पाळून स्वस्थ राहिलेले बरे नाही का? आणि जरी आलात तरी सरकारच्या सगळ्या नियमांचे पालन करून रीतसर परवानगी घेऊन यावे. गावी आल्यावर रीतसर जवळच्या सरकारी इस्पितळात जावे. कोरोनाची चाचणी (स्वॅब टेस्ट) करून घ्यावी. १४ किंवा २८ दिवस इस्पितळाच्या नियमांनुसार क्वारंटाईन व्हावे. सध्या प्रत्येक गावात, शहरात क्वारंटाईन होण्यासाठी आता शाळा, हॉस्पिटल किंवा हॉटेलसारख्या ठिकाणी सोय केलेली आहे. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःहून क्वारंटाईन व्हावे, जबरदस्ती करायला लावू नये.

अशा प्रकारच्या महामारीपासून वाचण्यासाठी गरज आहे ती आयुर्वेदशास्त्रात सांगितलेल्या दिनचर्या व ऋतुयर्चेचे पालन करण्याची. जनोपध्वंस रोग असू द्या किंवा इतर कुठलेही आजार होऊ नये म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वस्थवृत्ताचे पालन सांगितले आहे ते आचरण करण्याची गरज आता फक्त क्वारंटाईन व्यक्तीसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच आहे.

आत्ताचे तप्त वातावरण पाहता किंवा उन्हाळ्याचा ताप पाहता, आत्ताच्या ऋतुचर्येप्रमाणेच सगळ्यांनी दिनचर्येचे पालन करणे गरजेचे आहे. आता क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींनी तसेच कोरोना व्हायरस बाधित रुग्णांनी तसेच इतर जनसमुदायानी या उन्हाळ्यात आहार-विहाराचे खालीलप्रमाणे आचरण करावे…
* आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर उठावे.
साधारण साडे-चार ते पाच वाजेपर्यंत सकाळी सर्वांनी उठावे. हा काळ सात्विक असतो, ईशचिंतनासाठी उपयुक्त असतो. हवा शुद्ध असते. त्यामुळे प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाति, सूर्यनमस्कार यांसारखे व्यायाम, योगासने करावीत. म्हणजे चित्त शांत होते व मनस्वास्थ्य लाभते. सद्य स्थितीत मनस्वास्थ्याची अत्यंत आवश्यकता आहे. मनस्वास्थ्य असल्यास आपले निर्णय चुकत नाही.
* सकाळी लवकर उठून दंतधावनादी प्रातर्विधी उरकून व्यायाम, योग, जपादी कर्मे करून किंचित स्नेहन, उद्वर्तन करून कोमट पाण्याने स्नान करावे.
तत्‌पश्‍चात् पूजा-अर्चा करून तुलसी, दालचिनी, सुंठ, मिरी घालून काढा चहाप्रमाणे करून प्यावा.
* रोज च्यवनप्राशाचे चाटण करावे.
* रोज पंचांमृतासारखे रसायन सेवन करावे.
* पाव चमचा गुडूची चूर्ण दीड लीटर पाण्यामध्ये चांगले उकळून हे पाणी थर्मासमध्ये भरून ठेवून संपूर्ण दिवस थोडे थोडे प्यावे.
* संपूर्ण दिवसभर जरी गर्मी असली तरी गरम पाणीच प्यायला घ्यावे.
* रोज नाश्त्यासाठी काय करावे… असा विचार करत न बसता, सरळ साधे सुपाच्य जेवण करावे. साधारण सकाळी दहा वाजायच्या आत जेवावे. जेवणामध्ये डाळ-भात-तूप घ्यावे. सध्या कैर्‍या मिळतात, तेव्हा कैरीचे ताजे लोणचे, आंब्याची फोड, कडधान्याची एखादी उसळही चालते. एवढ्या जेवणात मस्त पोट भरते. हे जेवण पचायलाही हलके असते. आपल्याला पाहिजे तेवढी जीवनमूल्येही मिळतात.

– भाजी, मासे-मटण यांचा अट्टहास धरू नये.
* फळे खायची असल्यास आंबा, कलिंगड, पपई, द्राक्षे, केळी खायला हरकत नाही. पण ती गर्दी करून विकत आणू नये व शक्य असल्यास आपल्या गावात, शहरात जी मिळतात तीच खावी.
* दुपारचे जेवण फारसे जड नसावे. सकाळी जेवल्यावर दुपारी जेवायची खरं तर गरजच नाही. दुपारी मुगाचे कढण, तांदळाची पेज, रव्याची खीर, गव्हाची खीर इत्यादी. तरल पदार्थ सेवन करावे. दुपारी उन्हंही कडक असतात व तशी फारशी भूकही लागत नाही.
* रात्रीचे जेवण हे साधारण सूर्यास्तापूर्वीच करावे. साधारण सहा- साडेसहा वाजेपर्यंत हलका आहार घ्यावा. सकाळी जेवल्यास व दुपारी तरल पदार्थ खाल्ल्यास संध्याकाळी भूकही लागते. अशावेळी भाकरी- भाजी/ उसळ/पिठलं/चटणीसारखे पदार्थ सेवन करावेत.
* कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, आईसक्रीम या प्रकारातील कुठलीच पेये सेवन करू नये.
* ताक, कोकम सरबत, आवळा सरबत, कैरीचे पन्हे, शहाळ्याचे पाणी गरमीची तहान भागवण्यासाठी उपयुक्त आहे.
* दिवसभरात चांगले संतांच्या वाङ्‌मयाचे वाचन करावे.
* चांगली पुस्तके वाचावीत.
* संगीत ऐकावे, एखादा आपला छंद जोपासावा.
* रात्री लवकर झोपावे. दुपारी मात्र झोपू नये.
* वेगवेगळे पदार्थ घालून ज्या काही रेसिपी, खाद्यपदार्थ भगिनी बनवत आहेत, त्याला मात्र कुठेतरी आता पूर्णविराम द्या. कारण बरेच पदार्थ विरुद्ध अन्नामध्ये मोडतात. त्यामुळे ते पदार्थ आरोग्यास अहितकर ठरू शकतात.