आयआयटी प्रकरणात प्रसाद गावकरांकडून दलाली

0
258

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आरोप

सांगेचे आमदार प्रसाद गावकर हे सांगे येथे आयआयटी प्रकल्प होऊ घातला होता तेव्हा त्याच्या जमीन प्रकरणी आपल्या फायद्यासाठी दलाली करू पाहत होते असा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. सांगे मतदारसंघात आयआयटीचे स्वागत करण्याची आपली आजही तयारी आहे, असे आमदार गांवकर यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दलालीचा आरोप केला. मात्र, ही दलाली करण्यात त्यांना यश आले नव्हते, असे सावंत यांनी म्हटले आहे. प्रसाद गांवकर यांनी गुळेली येथे स्थानिकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन सरकारने आयआयटी प्रकल्प सांगेत हलवावा असा प्रस्ताव देताना सांगे मतदारसंघात तीन ठिकाणी जमीन असल्याचे म्हटले होते.

प्रसाद गांवकर हे आयआयटीच्या जमिनीसाठी दलाली करू पाहत होते. मात्र, जेव्हा ही दलाली करण्यास त्यांना अपयश आले तेव्हा त्यांनी माघार घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकार बाजारभावात आयआयटीसाठी १० लाख चौ.मी. एवढी जमीन खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.

आमदारांकडून दिशाभूल : भाजप
आयआयटी प्रकल्पासंबंधी आमदार गावकर यांनी दिशाभूल केल्याचा आरोप प्रवक्ते दामू नाईक ॅयांनी केला. ते म्हणाले की, सरकारने खरे म्हणजे सांगे येथेच आयआयटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा होणार होता ती जमीन जलसंसाधन खात्याच्या नावावर होती. मात्र, सरकारने तेथे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिकांनी ती जमीन आपली असल्याचा दावा करीत प्रकल्पाला विरोध केला होता.
माजी आमदार रामेश तवडकर यांनी, गांवकर यांनी संजीवनी साखर कारखान्याच्या प्रश्‍नीही शेतकर्‍यांची दिशाभूल केली. केंद्र सरकारच्या योजनेखाली राज्य सरकार नवा साखर कारखाना ५ वर्षांत उभा होणार असल्याचे सांगितले.