आभाळ फाटलेय

0
130

डिचोली तालुक्यातील साळसह राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती गंभीर बनल्याने शासकीय यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना जनतेच्या मदतीसाठी धावून जावे लागले. तिळारी धरणातून जादा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याचे दिसते आहे. वास्तविक, धरण पूर्ण भरून धोका उत्पन्न होईपर्यंत हे पाणी साठवून का ठेवले जाते व अचानक खालच्या भागांतील गावांतील जनतेला कल्पना न देता त्याचा विसर्ग का केला जातो हे सामान्य माणसांच्या दृष्टीने अनाकलनीय ठरते. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला गेला असता, तर अशी आकस्मिक पूरस्थिती उद्भवली नसती. परंतु एवढे शहाणपण संबंधित विभागांकडून कधी दाखवले जात नाही. यापूर्वीही अंजुणे धरणातून अचानक पाणी सोडल्याने साखळी डिचोलीच्या बाजारपेठा बुडण्याच्या घटना अनेक वर्षे घडत आलेल्या आहेत. गोवा हा समुद्राला जवळ आहे, त्यामुळे नद्यांमधील पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे जास्त पाऊस जरी पडला, तरी खरे म्हणजे महापुरासारखी स्थिती उद्भवता कामा नये, परंतु आपल्या नद्या गाळाने भरून त्यांची पात्रे उथळ बनलेली असल्याने पूर्वेला जरा पाऊस जास्त झाला की नद्या नाले तुडुंब भरून पाणी आजूबाजूच्या परिसरात जाते. अशा प्रकारच्या संभाव्य आपत्तीचा विचार करून यापूर्वी काही भागांमध्ये पूरप्रतिबंधात्मक उपाययोजनाही आजवर केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील पूरस्थिती हल्ली काही अपवाद वगळता गंभीर बनत नाही. उदाहरणार्थ पूर्वी डिचोली साखळीत पूर दरवर्षी यायचा आणि बाजारपेठा पाण्याखाली जाऊन व्यापारांचे अतोनात नुकसान व्हायचे. त्यानंतर साखळीत वाळवंटीतील गाळ उपसला गेला, संरक्षक भिंती बांधल्या गेल्या, पाण्याचा वेळीच उपसा करण्यासाठी पंप बसवले गेले. डिचोली नदीच्या कडेनेही पूरप्रतिबंधक भराव टाकण्यात आला. त्यामुळे त्या शहरांमध्ये पूर्वीप्रमाणे गंभीर स्थिती अलीकडे निर्माण होत नाही. मात्र, यावेळी पावसाचे प्रमाणच जास्त आहे. सुदैवाने वेधशाळेने पर्जन्यमानाचा अचूक अंदाज यावेळी वर्तवला होता. शिवाय मुंबई, कोकणपट्टी आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाच्या बातम्याही सातत्याने येत होत्या. त्यामुळे प्रशासनाला खबरदारीचे उपाय योजणे यावेळी शक्य झाले. त्यामुळे प्रशासन यावेळी बरेच दक्ष असल्याचे दिसून आले ही स्वागतार्ह बाब आहे. लोकप्रतिनिधींनीही जनसहाय्याची जी तत्परता दाखवली ती उल्लेखनीय आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचे प्रयत्न सुरू असलेले दिसत आहेत. ही बाब सरकारने अत्यंत गंभीरपणे घ्यावी. शाळांना सुटी असल्याचे खोटे संदेश पाठवले गेले. तिळारी धरण फुटल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. अशा प्रकारे अफवा पसरवणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि पोलिसांनी अशा अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेऊन कडक कारवाई केली तरच या प्रकारच्या गोष्टींना पायबंद बसेल. साळ, रेवोडा, उसगाव यासारख्या ठिकाणी जनतेला सुरक्षित स्थळी हलवणे भाग पडले. पूरस्थिती गंभीर बनत असलेली दिसत असूनही लोक आपली राहती घरे सोडायला तयार होत नाहीत त्यामुळे समस्येचे गांभीर्य अधिक वाढते. पूरपरिस्थितीत जनतेनेही थोडा समंजसपणा दाखवण्याची आवश्यकता आहे. आज गोव्यामध्ये दूध, भाज्या आदी जीवनावश्यक वस्तूंची मोठी टंचाई उद्भवलेली आहे. चोर्ला व अनमोड घाटमार्ग बंद आहेत, पूल कमकुवत बनल्याने आंबोलीहूनही वाहतूक ठप्प आहे. सांगली, कोल्हापुरात पुराने प्रचंड हानी पोहोचवलेली आहे. सिंधुदुर्गातही मुंबई – गोवा रस्ता पाण्याखाली आहे. उत्तर कर्नाटकही पुराने बेहाल आहे. अशा परिस्थितीमध्ये गोव्यासारख्या सर्वस्वी परराज्यावर अवलंबून असलेल्या राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा लवकरात लवकर सुरळीत करण्याकडे लक्ष पुरवावे. घाटमार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे तो सुरळीत होईल अशी आशा आहे. तो झाला नाही तर येत्या दोन – चार दिवसांत गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. सध्याची पूरपरिस्थिती ही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसाठी पुढील धोक्याची चाहुल आहे. आपली यंत्रणा अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सर्वतोपरी सज्ज आहे ना याची खातरजमा आपत्ती व्यवस्थापन अधिकारिणीने करावी. अनेकदा कागदोपत्री नियोजन परिपूर्ण दिसत असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्यावर त्रुटी उघड्या पडत असतात. यावेळी तसे होऊ नये. मुसळधार पावसाने राज्याच्या शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ते नेमके किती आहे हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु त्या शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा लागेल. नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना मदत द्यावी लागेल. केंद्र सरकारकडे राज्य सरकार हात पसरणार असले तरी देशाच्या अनेक भागांमध्ये याहून गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे आभाळच फाटलेय तेथे कुठे कुठे ठिगळे लावायची हा केंद्रासाठी प्रश्न असेल. त्यामुळे शक्यतो आपल्या जखमा आपल्या हिंमतीवर बुजविण्यातच प्रशासकीय कौशल्य असेल. प्रशासनासाठी हा कसोटीचा क्षण आहे.