आत्मनिर्भर भारत योजनेखाली पारंपरिक उद्योगांना चालना

0
301

>> मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेखाली राज्यातील पारंपरिक उद्योगांना कशी चालना देता येईल व ग्रामीण भागांत कशा प्रकारे मोठ्या संख्येने हे उद्योग उभारता येतील याचा आढावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका बैठकीतून घेतला. या पारंपरिक उद्योगांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेखाली राज्य सरकारला निधी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी केलेल्या ट्विटद्वारे आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या योजनेखाली राज्यातील पारंपरिक उद्योग पुनरुज्जीवी करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतल्याचे स्पष्ट केले. एकाच ठिकाणी अशा प्रकारचे कित्येक पारंपरिक उद्योग सुरू केले जाणार असून त्यामुळे लोकांना रोजगार प्राप्त होण्याबरोबरच महसूल वाढेल. स्थानिक कारागीर, शेतकरी, स्वयंसेवी संस्था असे सगळे लोक गटागटाने पुढे येऊन पारंपरिक उद्योग उभारतील. त्यासाठी त्यांना आवश्यक ती सुविधा केंद्रे उभारण्याचे काम सरकार करेल, असे आणखी एका ट्विटद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.