>> जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची आतापर्यंत 10 घरे उद्ध्वस्त
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी लोकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील अटारी सीमेवर पाकिस्तानच्या नागरिकांची गर्दी दिसत आहे. यापैकी काही लोकांनी भारत सरकारकडे अपीलही केले. देशातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास/ तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानींपैकी काही परतले आहेत, तर काही अजूनही सीमेवर परतण्याची वाट पाहत आहेत.
या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. 2 दिवसांत 272 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले आहेत. काल रविवारीही अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी, पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून 13 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह 629 भारतीय भारतात परतले आहेत. सार्क व्हिसाधारकांना भारत सोडण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल होती. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडावा लागेल. गेल्या तीन दिवसांत अटारी-वाघा सीमेवरुन 450 हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. तर, अटारी सीमेवर पाकिस्तानात परतणाऱ्या लोकांची मोठी गर्दी आहे.
10 घरे उद्धस्त
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करताना बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनी भागात लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय दहशतवादी जमील अहमद याचे घर उडवून दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची 10 घरे उद्धस्त केली आहेत.
दिल्लीत सुमारे 5000 पाकिस्तानी
इंटेलिजेंस ब्युरोने राजधानी दिल्लीत राहणाऱ्या सुमारे 5000 पाकिस्तानी नागरिकांची यादी दिल्ली पोलिसांना सोपवली आहे, गुजरात पोलिसांची कारवाई शनिवारी रात्री 12 वाजता सुरू कोली. यात अहमदाबादमध्ये 890 आणि सुरतमधून 134 लोकांना ताब्यात घेण्यात आले.