उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. ४०३ पैकी ५५ मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात ६२ % मतदारांनी आपला हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.
काल कडाक्याच्या थंडीमुळे दिवस दुपारपर्यंत येईस्तोवर बहुतेम मतदारांनी घरांत राहणेच पसंत केले मात्र नंतर हळूहळू गर्दी वाढत गेली. एकूण १८ हजार ८३ मतदार केंद्रांतून निवडणूक घेण्यात आली. दक्षता म्हणून ५५ हजार निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय १० हजार अन्य सुरक्षा कर्मी व पोलीस गस्त देत होते. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने दुसर्यांदा सत्तेवर येण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून त्यास समाजवादी पार्टी, कॉंग्रेस व राष्ट्रीय लोकदल तसेच भारतीय जनता पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे.