उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात काल मोठी दुर्घटना घडलेी. येथील यमुना नदीमध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील चार मुलींचा मृत्यू झाला, तर दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नगला गावाजवळ घडली. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी या मुली यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. नदीत उतरण्यापूर्वी या मुलींनी मोबाईलमधून रीलसुद्धा तयार केले होते. ही रील नदीच्या किनाऱ्यावर उभी राहून बनवण्यात आली होती. नदीत उतरल्यावर मुली पाण्यात पुढे-पुढे गेल्या. मात्र पाऊल पुढे टाकताच त्यांचा पाय खड्ड्यात पडला आणि त्या बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले; मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृत मुलींचे वय हे 10 ते 18 वर्षांदरम्यान आहे.