>> ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना मुदत
ज्यांच्याकडे बेहिशेबी संपत्ती आहे त्यांनी ती ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ‘मन की बात’ या त्यांच्या रेडिओवरील महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, बेहिशेबी संपत्तीची माहिती देणार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, मुदतीनंतर अघोषित मालमत्ता असल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मोदी यांनी दिला. स्वत:हून अघोषित देशांतर्गत संपत्ती जाहीर करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दीड लाख लोकांचे उत्पन्न ५० लाखांहून अधिक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे नियमितपणे करभरणा करणार्यांची देखील काळजी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारने काळ्या पैशांविरुद्ध कठोर पावले उचलताना बेकायदा संपत्ती असलेल्या नागरिकांना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे संबंधित लोकांनी ती दिलेल्या मुदतीत उघड करावी अशी सूचना करण्यात आली आहे.