हायड्रॉलिक पंप समुद्रात पडल्याने नाफ्ता खेचण्याचे काम लांबणीवर

0
133

>> मुख्यमंत्र्यांची माहिती

दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या ‘नुशी नलिनी’ या नाफ्तावाहू जहाजातील दोन हजार मेट्रिक टन नाफ्ता सुरक्षितपणे काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे जे काम आज गुरुवार दि. ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंपही आणण्यात आला होता. मात्र तो पंप काल समुद्रात पडल्याने नाफ्ता बाहेर काढण्याचे काम आजपासून हाती घेता येणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आता मुंबईहून नव्याने हायड्रॉलिक पंप आणावा लागणार असल्याने वरील काम २ नोव्हेंबरपासूनच हाती घेणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काल हायड्रॉलिक पंप हेलिकॉप्टरमधून नाफ्तावाहू जहाजावर नेण्यात येत असताना तो समुद्रात कोसळल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परिणामी ‘नुशी नलिनी’ ह्या जहाजातून सुरक्षितरित्या नाफ्ता काढून तो दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम २ नोव्हेंबरपूर्वी हाती घेता येणार नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.

‘नुशी नलिनी’ हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर ते दोनापावला येथे समुद्रात अडकून पडलेले आहे. त्यामुळे या जहाजातील दोन हजार मेट्रिक टन एवढा नाफ्ता हायट्रोलिक पंपच्या आधारे एका बार्जमध्ये घालण्याचे काम आज ३१ रोजीपासून सुरू होणार होते. मात्र त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंप हेलिकॉप्टरमधून जहाजात हलवण्याचे काम चालू असताना काल तो समुद्रात कोसळला. त्यामुळे एमपीटीला आता नवा हायड्रॉलिक पंप आणावा लागणार आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

नाफ्ता जहाज आणण्यात
मिलिंदचा हात नाही ः सावंत
दरम्यान, मुरगांव बंदरात नाफ्ता जहाज आणण्यामागे मंत्री मिलिंद नाईक यांचा हात असल्याचा कॉँग्रेसचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. हे जहाज मुरगांव बंदरात आणण्यामागे मंत्री मिलिंद नाईक यांचा कोणताही हात नसल्याचे सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, सदर जहाजात जो नाफ्ता आहे तो भेसळयुक्त नाफ्ता असल्याचा दावा मिलिंद नाईक यांनी केला होता. मात्र, नाईक यांनी केलेला दावा फेटाळून लावताना जहाजातील नाफ्ता भेसळयुक्त नसून पूर्णपणे शुद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.