स्वप्नं जगणारी माणसं…

0
249
  • अंजली आमोणकर

मुठीतल्या वाळूसारखी स्वप्नं पडतात, निसटतात, हरवतात, परत पडतात. स्वप्नांचंही एक वेगळंच जग असतं. पण त्यात कधी शिरायचं, त्यात किती रमायचं व त्यातून कधी बाहेर पडायचं हे माणसाला ठरवता आलं पाहिजे.

माणसाचं मन प्रचंड चंचल व अतिशय वेगवान असतं. त्यानं देहावर येणार्‍या प्रत्येक आपदेचं संशोधन, निराकरण केलं. गुंतागुंतीच्या रोगांवर यशस्वी उपचार शोधले. शास्त्रज्ञांचा दावा आहे की त्यांनी मानसिक घडामोडींवर, मनाच्या विविध अवस्थांवर, समस्यांवर उपचार-औषधे शोधली आहेत. तरीही मनाच्याच हिंदोळ्यापायी ज्या गोष्टींचा जन्म होतो, त्या स्वप्नांनी मात्र सर्वांना आजतागायत चकवलंय. झोपेत पडतात ती स्वप्नं म्हणजे मनाच्या हिंदोळ्यांची परिणती. पण जागेपणीदेखील स्वप्नं जगणारी माणसे समाजात आपण शेकड्यांनी बघतो. माणसाला जे मिळत नाही किंवा जे मिळवायचं असतं, त्याची स्वप्नं तो आयुष्यात बघतो. कुठलं तरी उदात्त ध्येय बाळगून ते साध्य करण्याकरिता धडपडणारी माणसे समाजात फार थोडी असतात. अशी ध्येयवादी माणसे जीवनाची वाटचाल करताना- स्वप्नपूर्तीसाठी, ऐहिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून रुक्ष, रखरखीत वाळवंट जरी समोर आले तरी ते संथपणे, अनवाणी, विनातक्रार तुडवीत राहतात. अर्थात, दुर्दैवानं ते स्वप्न पूर्ण झालं नाही तर पूर्ण न होण्याची जबाबदारी इतरांवर टाकून पळवाटही शोधत नाहीत. त्याचे भलेबुरे परिणाम कणखररीत्या स्वतःच भोगतात.

समाजातला दुसरा वर्ग असा पण आहे जो काही काळ व्यवहारी जीवन जगतो. ‘काम’, ‘अर्थ’- यांना व्यवस्थित उपभोगतो. पण त्यांच्या जीवनात अचानक असे काही प्रसंग वा घटना घडतात की त्या व्यक्ती अकस्मात सर्व सुखमय जीवन झुगारून वेगळ्याच ध्यासानं भारून जातात. हा ध्यासच त्यांचं स्वप्नं ठरतं. या स्वप्नाची ओढ इतकी बलशाली ठरते की जीवन त्यांना लोढणं वाटू लागतं. युवराज सिद्धार्थ, बाबा आमटे, महात्मा गांधी, सेनापती बापट, सावरकर, भगतसिंग अशा अनेक व्यक्ती या वर्गात मोडतात.

काही हृदयात स्वप्नांचा अखंड महासागर घेऊन फिरणार्‍या माणसांची पावलं कधीच थकत नाहीत. स्वप्नांपुढे त्यांना सर्वकाही तुच्छ वाटतं. मग ते स्वप्न देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं असो, उच्च शिक्षित होण्याचं असो, देशातल्या काही वाईट धार्मिक रीती-रिवाजांचं उच्चाटन करणं असो किंवा धार्मिक सुधारणा आणणं असो. स्वप्नपूर्ती करताना त्या-त्या व्यक्तींनी प्रचंड हाल सोसलेच, पण अनेकांच्या कुटुंबीयांची अतोनात परवडही झाली. शारीरिक-मानसिक-आर्थिक- सर्वच हाल. वास्तव जीवन स्वप्नेच्छुंनी जरी झुगारलं तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्याच वास्तवात, त्याच समाजात जगत राहायचं आहे, हे अनेकजण अनेकदा विसरलेले पाहत आलोय. त्याग करणं म्हणजे जबाबदारी झटकणे मुळीच नाही. मी तर पुढे जाऊन इतकंच म्हणेन की त्यांनी कुटुंबकबिला वाढवू नये व सर्व जबाबदार्‍या पूर्ण केल्याशिवाय संसार परित्याग करून स्वप्नपूर्तीच्या मागे धावू नये. कारण स्वप्नांचंही एक स्वप्न असतं. परिपूर्ण होण्याचं.

स्वप्नांमुळे जगण्याला दिशा मिळते. मनाचं हिरवं पान टवटवीत राहतं. आपण जसं आवडत्या व्यक्तीवर प्रेम करतो तसंच कोणावरही अन्याय न होऊ देता स्वप्नांवर करता आलं पाहिजे. मुठीतल्या वाळूसारखी स्वप्नं पडतात, निसटतात, हरवतात, परत पडतात. स्वप्नांचंही एक वेगळंच जग असतं. पण त्यात कधी शिरायचं, त्यात किती रमायचं व त्यातून कधी बाहेर पडायचं हे माणसाला ठरवता आलं पाहिजे. स्वप्नांच्या बेरजेची गणितं मांडताना कधीकधी आधीच होऊन गेलेला भागाकार लक्षात आला पाहिजे. खरं तर स्वप्नं म्हणजे ‘वो सुबह कभी तो आएगी’ची आशाच.

स्वप्नांची लहानशी पुरचुंडी हातात धरून अख्खं आयुष्य मन मारत जगणारा मध्यम वर्गीय पाहिला की त्याचे महत्त्व पटते. मात्र चोवीस तास फक्त स्वप्नातच दंग असलेली माणसे ‘येडी’च ठरतात. स्वप्नांना वास्तवाचं कोंदण हवं. कारण भव्य स्वप्नं बघायला जशी हिंमत लागते, ती पूर्ण करायला जशी ताकद लागते तशीच ती अपूर्ण उरल्यास किंवा भंग झाल्यास डोळ्यातल्या पाण्यासोबत गिळायला काळीज दगडाचं करावं लागतं. कधी आनंदी राहायचं, बेफिकीर असण्याचं नाटक करावं लागतं. ओठी एकच ओळ परत परत येत असते- ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा…’
स्वप्नं बघायला पैशांचीही गरज नसते. कारण ती स्वतःतूनच फुललेली असतात; बाजारातून विकत आणलेली असत नाहीत. भविष्याची स्वप्नं खरंतर कल्पनेसोबत खेळणारी खेळणी असतात. ती येतात कुठून-कशी व जातात कुठे-केव्हा हे कुणीही सांगू शकणार नाही. जगण्याला उभारी-ऊर्जा देणार्‍या, कठीण आयुष्य मवाळ करणार्‍या या स्वप्नांचं महत्त्व मानवी आयुष्यात एवढं आहे की जर स्वप्नं नसती तर माणूस वेडापिसा झाला असता. म्हटलं गेलं आहे ना- ‘कैद है कुछ ख्वाब इन खुली आँखों में, न जाने जागती रातों का कब सवेरा होगा…’