सावरकरांना विरोध का?

0
330

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचे वचन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले काय, त्यावर देशव्यापी वादाचे मोहोळ उठलेे आहे. सावरकरांचे नुसते नाव घेतले की आज वादाला सुरूवात होते हे दुर्दैव आहे. ‘कीं घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ म्हणत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी निःस्पृहपणे लढलेल्या आणि त्यासाठी प्रचंड किंमत मोजलेल्या सावरकरांच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव ‘भारतरत्न’ ने झाला काय, किंवा न झाला काय, त्यांनी देशासाठी केलेला त्याग आणि समर्पण, सोसलेला छळ आणि यातना याचे मोल यत्किंचितही कमी होणार नाही, परंतु या विवादाच्या निमित्ताने काही घटकांच्या कोत्या, संकुचित आणि स्वार्थी मनोवृत्तीचे दर्शन मात्र देशाला घडेल. यापूर्वीही स्वतःला विचारवंत म्हणवणार्‍या मणिशंकर अय्यर नावाच्या एका मस्तवाल नेत्याने सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या नावाची पाटी काढून टाकण्याचा हिडीस प्रकार केला होता. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास केवळ गांधी आणि नेहरूंपुरताच सीमित ठेवण्याचे षड्‌यंत्र सत्तर वर्षे चालले. सावरकरांपासून भगतसिंगांपर्यंत आणि नेताजींपासून अन्य अगणित क्रांतिकारकांपर्यंत या लढ्याचे श्रेय कधी पोहोचूच दिले गेले नाही. भले काहींचे मार्ग वेगळे असतील, परंतु ध्येय तर एकच होते? ते होते या देशाचे स्वातंत्र्य. त्यांची देशभक्ती, त्यांचे देशाप्रतीचे प्रेम काही कमी प्रतीचे नव्हते. पण त्या झुंजार देशभक्तांचे राष्ट्रकार्य इतिहासाच्या पानांतून मोजक्या ओळींत आटोपण्यात आले वा पुस्तकाबाहेर ठेवण्यात आले. हा कावा कॉंग्रेसच्या पदराखालून शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये धुडगूस घालणार्‍या डाव्या विचारवंतांचा होता. आता इतिहासाची वस्तुनिष्ठ पुनर्मांडणी करायची झाली तरी भगवीकरणाची ओरड करायला हीच मंडळी आघाडीवर! स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढ्या हाच अर्धवट इतिहास शिकत मोठ्या झाल्या आणि देशभक्ती, त्याग, समर्पण या मूल्यांना वंचित राहिल्या. प्रस्तुत प्रकरणामध्ये सावरकरांना ‘भारतरत्न’ दिले जाऊ नये यासाठी पूर्वीच गाडली गेलेली जुनीपुराणी भुते उकरून काढण्याचा प्रयत्न आज चालला आहे. आरोप अर्थात जुनेच आहेत. ‘सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती’, ‘गांधीहत्येच्या कटात त्यांचा सहभाग होता’ वगैरे वगैरे आरोपांची राळ पुन्हा एकवार उडवून दिली गेली आहे. माफीनाम्याचे म्हणाल तर छत्रपती शिवरायांवरही प्रसंगी तहाची वेळ आलेली होती आणि दोन पावले पुढे जायचे असेल तर एक पाऊल मागे हटणे हाही रणनीतीचा भाग मानून शिवरायांनी निमूटपणे आपण पराक्रमाने कमावलेले सगळे किल्ले मोगलांच्या स्वाधीन केले होेते. परंतु आग्य्राहून सुटका होताच त्याच पराक्रमी शिवरायांनी ते एकेक करून पुन्हा जिंकून घेत स्वराज्याची उभारणीही केली! सावरकरांनी खरोखर माफी मागितली होती का, असेल तर त्यामागची कारणे काय होती, व्यूहरचना काय होती, परिस्थिती कोणती होती या सगळ्या आजूबाजूच्या संदर्भांसह त्या घटनेची मांडणी झाली पाहिजे. पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या आणि आजही दुर्गम असलेल्या अंदमानमध्ये पाठवणी झालेल्या, एकांतवासामध्ये ठेवल्या गेलेल्या, दिवसभर कोलू पिसण्यासारखी अघोरी शिक्षा झालेल्या या क्रांतिकारकाच्या मनात काय चालले होते त्याचा अंदाज आपण कसा बांधू शकतो? त्यामुळे बाकी सगळे संदर्भ सोडून अशा गोष्टींची भुते उकरणे हे न्यायोचित नाही. गांधीहत्येबाबतही तेच आहे. गांधी हत्याकटात तत्कालीन कॉंग्रेस सरकारने सावरकरांना गोवले, परंतु ते आरोप सिद्ध झाले नाहीत. गांधीहत्येच्या विषयावर विपुल साहित्य उपलब्ध आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एखादा ठपका येणे, त्यातून पुढे मुक्तता होणे हा त्या प्रक्रियेचा भाग असतो. सावरकरांना त्यांच्या राष्ट्रकार्याचे श्रेय लाभू नये यासाठी काही घटक सातत्याने त्यांच्यावर दोषारोप करीत आले आहेत. आजही तेच चालले आहे. कॉंग्रेसने काल पत्रकार परिषद घेऊन सावरकरांना भारतरत्न दिले जाणार असेल तर देवा, तूच या देशाला वाचव! असे साकडे घातले. त्यांना अजूनही हे कळलेले नाही की ही सावरकरविरोधी भूमिका घेऊन कॉंग्रेसने स्वतःच महाराष्ट्रातील येत्या निवडणुकीतील आपल्या शवपेटीवर खिळा ठोकलेला आहे. भाजपच्या सापळ्यामध्ये कॉंग्रेस अलगद अडकली आहे, जशी ती गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बालाकोट हल्ल्याच्या विषयामध्ये सापळ्यात अडकली होती! सावरकरांविषयी भक्तिभाव जपणार्‍या मराठी माणसाला आज काय वाटत असेल याचा विचारही कॉंग्रेसच्या दिल्लीत बसून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या नेत्यांच्या मनात आलेला दिसत नाही. एकेकाळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या कॉंग्रेसशी नाते सांगणार्‍या आजच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे या देशाच्या राष्ट्रीयत्वाशी नातेच उरलेले नाही का असा प्रश्न त्यामुळे विचारला गेला तर नवल नाही. संघपरिवार आज सावरकरांचा वारसा सांगत असला तरी सावरकरांच्या हयायीत काही त्यांचे त्यांच्याशी फार सख्य नव्हते. ‘गाय हा उपयुक्त पशू’ संबोधणारे विज्ञानवादी सावरकर हिंदुत्ववाद्यांच्याही पचनी पडणारे नव्हते. आज सावरकरांचा उदोउदो चालला आहे तो मतांसाठी. विरोधात पुढे आलेल्यांना हेच उमगलेले नसेल तर कीव करावी तेवढी थोडीच!