लॉकडाऊन संपले पण कोरोना आहे

0
240

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी ः सणांच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन

लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू अद्याप आहे. त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात देशवासीयांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. यावेळी पुढे बोलताना कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत भारतवासीयांनी मोठा प्रवास केल्याचे सांगून जनतेचे कौतुकही पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल देशवासीयांना संबोधित करत होते.

आपापल्या जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी लोक आता घरातून बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक घडामोडींना चालना मिळू लागली आहे. सणासुदीच्या दिवसांत बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे. परंतु, लॉकडाऊन संपले असला तरी करोना व्हायरस मात्र अद्याप गेलेला नाही हे आपण विसरून चालणार नाही. गेल्या सात आठ महिन्यांमध्ये प्रत्येक भारतीयांनी केलेल्या प्रयत्नांसहीत सांभाळलेली परिस्थिती बिघडू द्यायची नाही’ असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.

निष्काळजी होऊ नका
सध्या अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओमधून लोकांनी सावधानता बाळगणे बंद केल्याचे दिसून येत आहे. ही गोष्ट बरोबर नाही. ही निष्काळजी होण्याची वेळ नाही. मास्कशिवाय घराबाहेर पडताना लोक दिसत आहेत. खरे तर घरातील व्यक्ती, कुटुंबापासून समाजापर्यंत सगळ्यांनाच हे धोकादायक आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन सुरूच ठेवा असे आवाहन नागरिकांना पंतप्रधानांनी केले.
कोरोनावर औषध किंवा लस येईपर्यंत आपल्याला ही कोरोनाविरोधातील लढाई सुरूच ठेवायची आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात थोडाही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला.

भारताचा रिकव्हरी रेट चांगला
अमेरिका किंवा युरोपातील देशांत कोरोना संक्रमणाचे रुग्ण कमी होत होते, परंतु हे आकडे पुन्हा एकदा वेगाने वाढत आहेत. त्यामानाने भारतातील परिस्थिती सुधारलेली आहे. आपल्या देशाचा रिकव्हरी रेटही चांगला असून मृत्यू दर कमी आहे. जगातील साधन-संपन्न देशांच्या तुलनेत भारत आपल्या जास्तीत जास्त नागरिकांचे जीवन वाचवण्यात यशस्वी ठरला असून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही नक्की विजयी होऊ अशी आशा व्यक्त केली.

सातव्यांदा संबोधित
कोरोना लॉकडाऊन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करण्याची सातवी वेळ आहे. मार्च महिन्यात १९ मार्च रोजी ’जनता कर्फ्यु’च्या आवाहनापासून या संबोधनांना सुरुवात झाली होती.

लशीसाठी वेगाने काम सुरू
भारतात कोरोनावरील अनेक लशींवर काम सुरू आहे. काही लस प्रगतीपथावर आहे. कोरोना लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत करू नका असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आपल्या देशातील तज्ज्ञ कोरोनाच्या लशीसाठी खूप मेहनत घेत आहेत. कोरोनाची लस येईल तेव्हा प्रत्येक भारतीयापर्यंत ती लवकरात लवकर कशी पोहचेल, याची तयारी सरकारकडून सुरू आहे.