भारत दहशतवादाची जननी !

0
114

>> सुषमा स्वराजांच्या वक्तव्यावर पाक

भारताच्या विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानवर कडाडून हल्ला केल्याने संतापलेल्या पाकने कांगावा करताना भारताला दहशतवादाची जननी असे संबोधले आहे. पाकच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मलिहा लोधी यांनी पाकतर्फे ही गरळ ओकताना भारत म्हणजे दक्षिण आशियातील दहशतवादाची जननी असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये भारताकडून दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा आरोप लोधा यांनी केला आहे. स्वराज यांनी काश्मीर विषयाला बगल दिल्याबद्दलही लोधा यांनी टीका केली. तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी अत्यंत कणखरपणे पाकिस्तानचा उल्लेख ‘टेररीस्तान’ असा करताना पाकने केवळ दहशतवादी संघटनांची निर्मिती करण्यात धन्यता मानली असे आपल्या भाषणात सुनावले. त्यामुळे संतापलेल्या पाकच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी वरील वक्तव्य केले. ‘दोन शेजारी देशांमधील संघर्ष टळावा असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असल्यास भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याच्या सूचना कराव्या’ असे लोधी संयुक्त राष्ट्रांत म्हणाल्या. नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याच्या सूचना भारताला द्याव्यात. भारताने पाकमधील दहशतवादी कारवायांना सहाय्य करणे बंद करावे असे त्या म्हणाल्या.