बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन

0
9

>> नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली शपथ

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जनता दल युनायटेडने (जदयू) काल पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) संसार थाटला. जदयूने राजद आणि इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधन सरकारची स्थापना केली.

जदयूचे नेते नितीश कुमार यांनी काल आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

जदयूने मोठा धक्का दिल्याने भाजपला बिहारमधील सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राजद आणि अन्य मित्रपक्षांची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली. नितीश कुमार यांच्या भूमिकेने बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपने जदयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणार्‍या भाजपला बिहारमधील सत्ता मात्र गमवावी लागली आहे.

महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून, या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना बुधवारी शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यासोबतच तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमधील महागठबंधनमध्ये जदयू, राजद, कॉंग्रेस आणि अन्य मित्रपक्षांचा समावेश आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचे संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होते. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश होता.