नात्यातला गोडवा

0
246
  • गौरी भालचंद्र

 

कुटुंबातली नाती जपायची आणि स्वत:ला विश्रांती, आनंद मिळवायचा आहे यासाठी बर्‍याच वेळा पिकनिक्स, ट्रिप्सच्या निमित्ताने नात्यातला गोडवा जपायला मदत होत असते, असे अगदी प्रकर्षाने वाटते. कोणाचाही मनापासून आदर  केल्याने… एकमेकांसोबत वागताना समजूतदारपणा दाखवल्याने नात्यातील गोडवा टिकून राहतो.

 

नात्यांचा जमाखर्च मांडायला गेलं की खूप गोंधळ उडतो कारण नात्यांपेक्षा माणसांचीच गर्दी जास्त होते. नात्यांना मोकळेपणाने श्वास  घेऊ दिला तर त्यांना वाढायला… बहरायला मदतच होईल. एक सांगू खरं तर… नाती ही मनासाठी टॉनिकचं काम करत असतात. आपल्या मनाचं स्वास्थ जपण्यासाठी नाती जपणं खूप महत्वाचं झालं आहे. प्रत्येकालाच मला वाटते नात्यांची… माणसांची गरज असते … पण काहींच्या ते लक्षात येतं तर काहींच्या नाही…  प्रत्येक नात्याला एक वेगळी जागा देण्याची गरज असते. विश्वासपूर्वक.

नातं टिकवणं हेही एक कौशल्याचं काम आहे … सगळ्या कसरती पार करून नाती टिकवावी लागतातच … कारण नात्यांसोबत जगण्यालाच अर्थ आहे… मजा आहे…  हे नात्यांचे गणित जमले तर सुख आपोआपच निर्माण होत जाते… एकमेकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देत, प्रोत्साहन देत हे नातं जपलं तर मनाचा कोपरा कसा मोकळं मोकळं हसतो … मोजकीच नाती जपावीत… पण त्यातून एकमेकात आनंदाची देवाणघेवाण होण्याइतपत ती मस्त असावीत. त्यात गोडवा असावा मनापासून केलेल्या संवादांचा …

आयुष्यात बरच काही सुंदर आहे. निसर्गानं भरभरून दिलं आहे. निसर्गातील पक्षी, झाडे-वेलींच्या निरिक्षणाचा आनंद घेताच आला पाहिजे … रस्त्यावरून चालताना शेजारी एखादं पथनाटय सुरू असते, आपल्यालाही ते बघायचे असते पण वेळ मात्र नसतो. स्वत:साठी जगता-जगता आजूबाजूला छान चाललेल्या गोष्टींचा आस्वाद घेताच आला पाहिजे..

आपल्याभोवती नेहमीच आतून- बाहेरून स्वच्छ सुंदर पारदर्शी मन असलेली माणसं असावीत, त्यांचे संपर्कांतील प्रत्येक माणसांशी वागणे-बोलणे स्वच्छ निर्मळ असावे. ज्यांच्याशी मनमोकळं बोलल्यानंतर प्रसन्न वाटावं, सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याइतपत त्यांच्यात सहकार्याची भावना असावी. एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी परखडपणे एकमेकांचे कान पकडण्यापर्यंत अधिकार आणि मायेचा ओलावा असावा. कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही इतपत निर्मळ – निरपेक्ष नातं मनामनात असावं.

घरातल्या गृहिणीमुळे घराला खरे घरपण मिळते. नात्यातला गोडवा त्यांच्या असण्यानेच टिकून राहतो. त्यांच्या न संपणार्‍या कामाची यादी ही कधीही न संपणारी आहे.  सकाळी उठून केरकचरा काढणे, धुणी-भांडी करणे, पडदे लावणे-बदलणे, झाडांना पाणी घालणे, सडारांगोळी करणे, देवपूजा करणे, दिवाबत्ती करणे, सकाळचा नाष्टा, दुपारचेजेवण, पुन्हा सायंकाळचा नाष्टा, रात्रीचे जेवण, मधल्या वेळेत घर लावणे, पसारा लावणे, थोरामोठ्यांची सेवा करणे तसेच वेळप्रसंगी बाहेर जाऊन बाजारहाट करणे, वेळप्रसंगी शाळा-कॉलेजचे शुल्क भरणे, मुलांच्या पॅरेन्टस् मिटिंग अटेन्ड करणे, दिलेल्या पैशातून नियोजनबद्ध घर चालवणे, पैसे वाचवून आकस्मित अशी ठराविक ठेव निर्माण करणे… अशा विविध कामांचा त्यांच्या रोजच्या कामात समावेश असतो.

कौटुंबिक कार्यक्रमात वा इतर ठिकाणी भेटल्यानंतर एकमेकांशी बोलायला तितकीशी सवड मिळत नाही, परंतु या पिकनिकला गेल्यानंतर मात्र मनमोकळेपणानं खूप गप्पा मारता येतात.  सुटीच्या कालावधीत  नातेवाईकांना भेटण्याबरोबर स्वत:ला विश्रांती, आनंदही मिळत असतो. मग अशा वेळी छोट्यामोठ्या सहलींचे नियोजन करून दोन्ही हेतू साध्य होत असतात. काही  माणसांबरोबर बालपण पुन्हा अनुभवता येतं आणि काही  माणसांबरोबरची नाती घट्ट करता येतात…

मोकळा श्वास घेण्याची प्रत्येकाची  इच्छा असते;  जवळच्या मंडळींना भेटण्याची इच्छाही पूर्ण करायची आणि स्वत:लाही ताजंतवानं करायचं असेल तर  कुटुंबासोबत पर्यटन करण्याने नातीही जपली जातात आणि मनाला ताजेतवानेपणाची जाणीवही होते. आणि त्यातूनच नात्यातला गोडवा सहजपणे जपला जातो… जोपासला जातो कुटुंबातली नाती जपायची आणि स्वत:ला विश्रांती, आनंद मिळवायचा आहे यासाठी बर्‍याच वेळा पिकनिक्स, ट्रिप्सच्या निमित्ताने नात्यातला गोडवा जपायला मदत होत असते, असे अगदी प्रकर्षाने वाटते. कोणाचाही मनापासून आदर  केल्याने… एकमेकांसोबत वागताना समजूतदारपणा दाखवल्याने नात्यातील गोडवा टिकून राहतो.